Anil Babar, Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : आघाडीमुळे नव्हे, महायुतीमुळे आमदार अनिल बाबर यांची वाट खडतर?

Rahul Gadkar

Maharashtra Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांच्यात उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात त्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार अनिल बाबर यांना आघाडीच्या उमेदवारांपेक्षा महायुतीतील इच्छुकांचा सामना करावा लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे मोठे वलय आहे, पण त्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पाटील हे सज्ज झाले आहेत. दोघांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. खासदार संजय पाटील आणि अनिल बाबर यांच्यातील राजकीय वैर सांगली जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. त्यामुळे खासदार संजय पाटील यांनी आपली ताकद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने उभी केली आहे.

राजेंद्र देशमुख यांच्या पडळकरांना शुभेच्छा, तर अमरसिंह देशमुख यांच्याकडून बाबर यांना पसंती

आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना ताकद दिली असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी थेट भावी आमदार अशा शुभेच्छा पडळकर यांना देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते, तर खानापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख अमरसिंह देशमुख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अबोला धरल्याचे चित्र आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याशी जवळीकता करून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे चित्र आहे.

तानाजी पाटलांवर बाबर नाराज?

कारखाना निवडणुकीत तानाजी पाटील यांनी कोणताही सहभाग घेऊ नये, असा सल्ला त्यांचे राजकीय गुरू आमदार अनिल बाबर यांनी दिला होता. मात्र, तो सल्ला न मानल्याने आमदार बाबर हे तानाजी पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी तानाजी पाटील यांची जवळीकता वाढली आहे. एकीकडे एकमेकांवर नाराज नसल्याचेही दाखवून दिले आहे. मात्र, अमरसिंह देशमुख यांच्याशी जवळकीता करून बाबर यांनीदेखील दुसरा पर्याय शोधण्याचे काम सुरू ठेवले आहे.

वैभव पाटलांची खासदारांशी जवळीकता

राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सांगलीच्या दुष्काळाबाबत चर्चा केली होती, तर खासदार संजय पाटील यांच्यासोबत उठबस वाढवली आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे.

महायुतीचा निर्णय अंतिम

महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या माध्यमातून जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे तिघेही सांगतात. त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू राहणार असेही सांगितले जाते. मात्र, या मतदारसंघात तिघांनीही दावा केल्याने कार्यकर्त्यांची गोची झालीच आहे. शिवाय महायुतीत अनिल बाबरांची अडचण झाली हे नक्की.

Edited by : Sachin Fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT