Purushottam Jadhav, Eknath Shinde
Purushottam Jadhav, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शिवसेनेला खिंडार; 700 शिवसैनिक शिंदे गटामध्ये सामील... पुरुषोत्तम जाधव

Umesh Bambare-Patil

सातारा : जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारणीला अखेर खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले. खंडाळ्याचे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव, रहिमतपूरचे वासुदेव माने यांच्यासह जिल्ह्यातील सातशे सदस्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जाधव Purushottam Jadhav यांनी दिली आहे. दरम्यान, यापुढे आपली लढाई राष्ट्रवादीशी असून २०२४ मध्ये राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातून उच्चाटन करू, असा विश्वास ही श्री. जाधव यांनी व्यक्त केला.

सातारा शासकीय विश्रामगृहात पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वासुदेव माने ठाणे येथील नगरसेवक शरद कणसे, जालिंदर गोडसे, निलेश मोरे, रुपेश सपकाळ आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव पुढे म्हणाले, " मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे सातारा जिल्हा आनंद झाला आहे. सातारा जिल्ह्याचे जे प्रलंबित विकासाचे प्रश्न आहेत ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी द्वारे आम्ही निश्चितपणे सोडवू.

साताऱ्यातील 99 टक्के शिवसैनिक हे शिंदे गटाबरोबर आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही हाडाची काडे केली त्यांनी आमच्यासाठी काय केले, जिल्ह्याला निधी नसल्याने विकास कामे प्रलंबित आहेत. गेल्या अडीच वर्षात आम्ही वारंवार विनंती करूनही आम्हाला राजकीय ताकद मिळाली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात विरोधातच काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक खचला आहे, सत्तेसाठी जी आघाडी करण्यात आली होती ती शिवसेनेला मान्य नव्हती.

पण, आम्ही शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्यातून उच्चाटन करू. याकरता शिवसेनेचे सर्व भूमिपूत्र आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा पुरुषोत्तम जाधव यांनी केला. श्री. जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यात शिवसेनेने खूप सोसले आहे शिवसैनिकांना उभारी मिळणे गरजेचे आहे जर जिल्ह्याच्या तीन कोपऱ्यातील तीन जिल्हाप्रमुख त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील मतदारसंघात टाकले गेले.

तर जिल्ह्याचा विकास आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न कसे सोडवले जाणार संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीसाठी एकच जिल्हाप्रमुख हवा भाजपचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात बारा वर्षांपूर्वी आपण लोकसभेची निवडणूक लढली होती. आता आपण युतीच्या एकाच गोटात आहात मग आपली अडचण होणार नाही का, या प्रश्नावर श्री. जाधव म्हणाले, माझा संघर्ष राष्ट्रवादीशी होता आणि यापुढेही कायम राहिल.

उदयनराजे हे माझे चांगले मित्र आहेत. भूमिहीनांच्या संदर्भातील मोर्चामध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केलं आहे. राष्ट्रवादीने नेहमीच कळीच राजकारण करत शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी देण्याचे पाप केले. त्यामुळे आमचा संघर्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांशीत असून ती जिल्ह्यातून मोडीत काढण्याचे शिवधनुष्य आम्ही यशस्वीपणे पेलू, असा दावा त्यांनी केला.

कोण बानुगडे मी ओळखत नाही...

सातारा सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या विषयी बोलताना श्री. जाधव म्हणाले, कोण नितीन बानगुडे पाटील यांना मी ओळखत नाहीत. कोण कुठले त्यांचा पत्ता मला माहित नाही. गेल्या अडीच वर्षात ते कोठे होते, तेही मला माहित नाही. ते नुसतच बोलतात, त्यांच्या नेतृत्वाखाली किती ग्रामपंचायती निवडून आल्या आणि शिवसेनेने किती प्रगती केली हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसैनिक खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतो, असा दावा त्यांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT