Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रपणे लढण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हे जवळपास एकत्रच लढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली पीछेहाट त्यासोबत काँग्रेस राहिलेले अस्तित्व यावरच महाविकास आघाडीची उमेद आहे. अशात महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांच्यावरच जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमीका मांडताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचे संकेत दिले होते. काँग्रेस - राष्ट्रवादीने यापुर्वी सुध्दा अनेक महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमीका अशीच आहे. शक्य होईल तिथं युती होईल. मुंबई, ठाणेसह काही महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवण्याची शिवसेना ठाकरे पक्षाने भूमिका घेतलेली आहे. कारण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे.
काँग्रेसचे वरीष्ठ नेते एकत्र बसून याबाबतीत धोरण ठरवतील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होईल, पण वेळ आल्यास स्वतंत्र लढण्याचाही तयारी असल्याचे देखील सतेज पाटील म्हणाले.
एकंदरीतच चित्र पाहता कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद अधिक आहे. 2019 नंतर जिल्ह्याने चार विधानसभेचे तर दोन विधान परिषदेचे आमदार दिले आहेत. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही. तरी अस्तित्व ठळकपणे आहे. शिवाय गटातटाची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाची आहे.
सध्या काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील आणि शिक्षक आमदार जयंत पाटील आसगावकर आहेत. शिवाय जिल्ह्याचे नेते म्हणून सतेज पाटील परिचित आहेत. गोकुळ, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निमित्ताने त्यांची जिल्ह्यावर पकड आहे. शिवाय तालुकास्तरावर पाटील गट सक्रिय आहे. बदलत्या राजकीय भूमीनुसार महायुती एकत्र लढल्यास नाराजांची संख्या अधिक असणार आहे. अशा नाराजांना गळाला लावण्याचे काम सतेज पाटील करू शकतात.
महाविकास आघाडीमधील ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अस्तित्वहीन झाली आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश आल्याने जिल्हास्तरावर नेतृत्वाची कमतरता आहे. शिवाय पक्षाकडून मिळणारी रसद अल्प प्रमाणात आहे. ठाकरेंची शिवसेना तर इतर पक्षाला मोठे करण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करते. तसेच जिल्ह्यात पदाधिकारी असल्याचा आरोप निष्ठावंत शिवसैनिकांकडून केला जात आहे.
खमके नेतृत्व नसल्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा चेहरा समोर आणण्याची गरज आहे. आता तर जिल्हास्तरावर राजकीय पकड निर्माण करण्यासाठी वेळ आणि कालावधीची कमतरता आहे. राष्ट्रवादीकडे देखील जिल्हास्तरावर पकड असणाऱ्या नेतृत्वाची कमतरता आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची संपूर्ण मतदार ही काँग्रेसवर असणार आहे. या सर्व घडामोडीचा अंदाज घेतला तर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेसच अधिक जागा मिळवेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.