Politics on Balinga Bridge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Flood : महापुराच्या पाण्यात राजकीय होड्या सुसाट; श्रेयासाठी नेत्यांच्या बालिंगा पुलावरून 'उड्या'...

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापूरला सध्या महापुराचा विळखा बसला आहे. महापुराचे पाणी ओसरत असले तरी  जिल्ह्यातील अनेक नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. पंचगंगा अजूनही धोक्याच्या पातळीवरून तर भोगावती नदी अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे.

भोगावती नदीवरील असलेला बालिंगा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण याचंच राजकारण करून आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांनी विधानसभेची पोळी भाजण्याची संधी साधली आहे. बालिंगा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यावरून श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे.

माझ्या नेत्याने पूल सुरु केला असा कांगावा काहींनी सुरु केला आहे. आमदारकीची स्वप्न बघणाऱ्या  नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून श्रेयवादाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पण शंभर वर्षे पूर्ण झालेल्या आणि वैधता संपलेल्या पुलावरून वाहतूक करणे तितकेच धोकादायक आहे. एखादी विपरीत हानी घडल्यास त्याची जबाबदारी घेण्यासाठी श्रेयवाद करणारे इच्छुक पुढे येतील का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.  

कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग तसेच कोकणला जोडणारा बालिंगा आणि दोनोडे दरम्यान असणारा बालिंगा पूल सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेते यांची श्रेयवादाची लढाई याच पुलावरून सुरू झाली आहे.

ब्रिटिश कालीन असणारा हा पूल 135 वर्षापेक्षाही अधिक कालावधीतील आहे. मागील महापुराच्या काळात पुलाला कोणताही धोका होऊ नये साठी त्याला पाणी टेकल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाकडून हा पूल बंद करण्यात आला. सध्या या पुलाला पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र ग्रामीण भाग आणि साखर कारखान्याची जोडणारा हा महत्त्वाचा पुल आहे.

दररोज 32 हजार टन क्षमता झेलणाऱ्या पुलाला महापुरात धोका उद्भवू नये तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी यंदाही हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा पूल बंद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होते हे नक्की आहे. पण खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून हा पूल बंद करण्यात येतो.

पुल वाहतुकीसाठी चालू करण्यात यावा यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली. त्यानंतर भोगावती नदी धोका पातळीवर असूनही हा पूल वाहतुकीसाठी चालू करण्यात आला. रस्त्यावरचे पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सेवा काल सुरू करण्यात आली. याचे श्रेय घेत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर सोशल मीडियात झळकवण्यात आले.

पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात बालिंगा फुल हा राहुल पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाला असे पोस्टर व्हायरल केले. त्यावरून आता या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियात चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची संधी साधून दोघांनीही आपली राजकीय पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र याच पुलावरून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी घेण्यास हे दोघेही पुढे येतील का? असा सवाल उपस्थित होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT