Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : कारखान्यात दडलंय काय? कर्जामुळे झोप न लागणाऱ्या मंत्र्याच्या पायाला भिंगरी

Rahul Gadkar

Kolhapur Political News : शेतकरी संघटनेने आंदोलन केलं, की नेहमीच कारखाना कर्जात असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी कारखान्यावर वाढत चाललेला कर्जाचा हिशोब कारखानदार माध्यमांसमोर मांडत असतात.

त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी 'मी लहान असल्यापासून कारखानदारांवरील कर्ज ऐकत आलो आहे, अजूनही कारखाने कर्जात आहेत. जर कारखाने अजूनही कर्जात असतील तर ते चालवतात,' कसे असा सवालही उपस्थित केला होता.

मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे एक अजब विधान पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यावरील कर्जामुळे मला झोप लागत नाही, असे वक्तव्य करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनीच कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे.

एकीकडे शारीरिक स्वास्थ्याची चिंता व्यक्त करणारे मुश्रीफ बिद्री सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी गावोगावी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे त्यांचे हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

इतकंच नव्हे तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेल्या दीड आठवड्यापासून कोल्हापुरातच तळ ठोकला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन तालुके अक्षरशः पिंजून काढले आहेत.

राज्याच्या प्रश्नांपेक्षा त्यांना बिद्री कारखाना महत्त्वाचा वाटत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. इतकच नव्हे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीलासुद्धा मंत्री मुश्रीफ उपस्थित नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमके काय म्हणाले होते मुश्रीफ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने 23 दिवस बंद होते. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांना त्याबाबत प्रश्न विचारला होता. "आंदोलनामुळे आमच्या जिल्ह्यातले साखर कारखाने बंद आहेत, हे दुर्दैवी आहे. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे.

कारखान्यावरील कर्ज इतकं वाढलं आहे की, मला आता रात्रीची झोप लागत नाही. एकरकमी एफआरपी दिल्यामुळे कारखान्यांना वारंवार कर्ज काढावं लागलं आहे. दुसऱ्या बाजूला तीन-चार महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढले आहेत. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीमुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फटका या कारखान्यांना बसत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले होते.

सत्तेतले मंत्री बिद्रीत विरोधात

राज्यातले दोन मातब्बर मंत्री बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या रिंगणात आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दीड आठवड्यापासून, तर मंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहेत.

सत्तेतले दोन मंत्री एकमेकांच्या विरोधात आहेत. आणि राज्यातले विरोधक बिद्रीत एकत्र आहेत. त्यामुळे कारखान्यात असं दडलंय काय? अशी विचारण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT