kolhapur loksabha election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी अन् महायुतीच्या उमेदवारीचं भिजत घोंगडे; नेत्यांचा लागणार कस

सरकारनामा ब्युरो

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. पण, अद्यापही लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण असणार हे निश्चित झालं नाही. त्यामुळे उमेदवारांमागे ताकद लावणाऱ्या नेत्यांचीच कसोटी निवडणुकीत लागणार आहे. आताच्या स्थितीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना निश्चित आहे. मात्र, उमेदवारांच्या निश्चितीनंतर खऱ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

शिवसेना ( Shivsena ) आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. दोन्ही पक्षांचे चिन्ह आणि नावही पक्षातून बाहेर गेलेल्या नेतृत्वाला मिळालं आहे. त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले आहेत. त्यामुळे कोण कोणत्या गटात हे निश्चित झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असतील. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. 2019 मध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार विजयी झाले होते, पण दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. आताही दोन्ही जागा शिंदे गटालाच मिळतील, असा दावा राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेते करत आहेत. यावर भाजपकडून अद्याप कुठंलही भाष्य करण्यात आलं नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. धनंजय महाडिक यांच्या रूपानं राज्यसभा खासदार पद त्यांच्याकडं आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांपैकी एक जागा, त्यातही कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप नेते आग्रही आहेत. त्यामुळे कदाचित भाजपकडून स्पष्ट मत व्यक्त केले जात नाही. शिंदे गटाचे दोन विद्यमान खासदार सोडले, तर महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे ताकदीचा उमेदवार नाही.

त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्याशिवाय कोण कोणाबरोबर हे सांगणे अवघड आहे, पण उमेदवार कोणीही असले तरी त्यांच्यामागे ताकद उभा करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 1998 पासून लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला, तर देशातील राजकीय बदलांचा जिल्ह्याचा राजकारणावर काहीच फरक पडत नाही. त्याचा फटका अनेक दिग्गजांना यापूर्वी बसला आहे.

हा इतिहास पाहता उमेदवार ठरविताना सर्वच पक्षांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा उमेदवार जाहीर कोण करतं? ही उत्सुकता सर्वांना असेल. अगोदर उमेदवारी जाहीर करून त्याचा विरोधकांना फायदा होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाईल.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT