Kolhapur Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election: यंदा कोल्हापूर महापालिकेची लढाई सोपी नसणार, मातब्बर नेत्यांसह इच्छुकांनाही घाम फोडणार; 'हे' मोठं कारण आलं समोर

Kolhapur Municipal Elections : राज्याच्या नगररचना विभागाने महानगरपालिकेतील निवडणुका एक प्रभाग चार सदस्य रचनेप्रमाणे घेण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय पक्षांच्या सोयीचा असला तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तोट्याचा आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका अखेर ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र आज निवडणुका होतील, उद्या निवडणूक होतील, या आशेने थांबलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होणार आहे. चार वर्ष निवडणूक होईल या आशेने सार्वजनिक तरुण मंडळासह विविध कार्यक्रमांना फंड डोनेट करणाऱ्या गब्बर नेत्यांसह वर्गण्या आणि देणग्या देऊन नाव प्रतिष्ठित करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाही यंदाची निवडणूक घाम फोडणारी असणार आहे. त्यात भर म्हणून महानगरपालिकेच्या चार सदस्य प्रभाग रचनेमुळे आणखीच पाय खोलात जाणार आहे.

राज्याच्या नगररचना विभागाने महानगरपालिकेतील निवडणुका एक प्रभाग चार सदस्य रचनेप्रमाणे घेण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय पक्षांच्या सोयीचा असला तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तोट्याचा आहे. कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेत ज्या कारभाऱ्यांचे नाव आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे. असेच कारभारी या निवडणुकीच्या निमित्ताने रणांगणात असू शकतात. पण जो सर्वसामान्य कार्यकर्ता या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्याच्या मात्र तोंडाला फेस येणार आहे. आधीच काही इच्छुकांनी चार वर्षापासून या निवडणुकीची आशा लावून धरले होते. तोपर्यंत अनेक मतदारांनी काही इच्छुकांचे खिसे रिकामे केले आहेत.

कोल्हापूर महापालिकेत (Municipal Elections) यापूर्वी एक प्रभाग एक सदस्य रचनेप्रमाणे सात हजार मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद आवाक्यात होती. आर्थिकदृष्ट्या परवडत होते. पण यंदा हे प्रभाग जवळपास 24 हजार मतदारसंख्यांचे असणार आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात आणि आर्थिक पर्याय घेऊन मतदारापर्यंत पोहोचणे सर्वसामान्य कार्यकर्त्याला अशक्य आहे.

काहीजणांनी मतदारसंघ गृहीत धरूनच मतदारांपर्यंत संपर्क ठेवला आहे. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अंतिम प्रभाग रचनेची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामुळे 24 ते 30 हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

निवडणूक कोणालाही सोपी नाही

राजकीय नेत्यांना युती आणि आघाडी करूनच या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांचे पॅनल तयार करूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल. जर एखाद्या मतदारसंघात दोन ते तीन ताकदवान उमेदवार असतील तरच ते चौथ्या उमेदवाराला निवडून आणू शकतात.

याउलट तर मतदारसंघात एकच उमेदवार प्रभावशाली असेल. अन् बाकीचे उमेदवार कमी प्रभावाचे असतील तर तो प्रभावशाली उमेदवाराला देखील पराभव करू शकतो. त्यामुळे ही निवडणूक कोणालाच सोपी नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT