Satej Patil
Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापूरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

सरकारनामा ब्यूरो

Congress Latest News : माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असून कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आपटे यांनी तडकाफडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेसमधील बंडखोरी व कुरघोडीनं डोकं वर काढले आहे. तसेच उमेदवारांच्या पाठिंब्यावरुनही महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं देखील समोर आलं आहे. याचदरम्यान,कोल्हापूरमध्ये उमेश आपटे यांनी राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे (Umesh Apte) यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे. आपटे यांची सतेज पाटील (Satej Patil) यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांनी काँग्रेस(Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचा राजीनामा देताना आपटे यांनी कौटुंबिक कारण दिल्याची माहिती आहे. तसेच पक्षात काम करत असताना अडचणी येत असल्याचंही म्हटलं आहे. यानंतर काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उमेश आपटे यांनी पुढील राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली नाही. मात्र. ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात जोर धरु लागली आहे. मात्र. जर ते भाजपमध्ये दाखल झाले तर निश्चितच कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.

पटोले व देशमुख यांच्यात कलगीतुरा

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. देशमुख यांनी पटोले यांची तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद झेपत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे असे डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना सांगितले आहे तसे पत्रही त्यांनी दिले आहे.

यावर नाना पटोले म्हणाले, मी संस्थानिक नाही आणी मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला त्यांनी देशमुखांना लगावला. निवडणुकीच्या स्थितीत काही स्थिती उद्भवली असेलही, तर पक्ष पातळीवर त्यावर निर्णय घेतला जाईल. कुणी परस्पर काहीही बोलत असेल, घोषणा करीत असेल, तर त्याला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले. यामुळे नाना पटोले आणि आशिष देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT