Minister Hasan Mushrif addressing farmers’ concerns on the Shaktipeeth Highway while highlighting Rahul and Rajesh Patil’s NCP entry in Kolhapur politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : "बंटी पाटलांनी अपशकून..." राहुल पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून मंत्री मुश्रीफांनी डिवचलं

Hasan Mushrif on Rahul Patil NCP Entry : "बंटी पाटील यांनी 15 ऑगस्टला शेतकऱ्यांबरोबर खरडा भाकरी खाल्ली त्यावेळी काँग्रेस नेते नितीन राऊतांना बोलवलं असतं तर बरं झालं असतं. बंटी पाटील म्हणाले, मंत्री मुश्रीफांनी दिलेला शब्द पाळावा, मात्र राऊतंच शब्द पाळणार नसतील तर माझ्या पाळण्याबद्दल ते अपेक्षा का करतायत? "

Rahul Gadkar

Kolhapur News, 22 Aug : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाबद्दल वेळोवेळी भूमिका मांडली आहे. आम्हीही राज्य शासनाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या आहेत. महामार्ग कोणावरही लादणार नाही ही त्यांची भूमिका आहे.

मात्र, आमचे मित्र बंटी पाटील यांनी 15 ऑगस्ट दिवशी शेतकऱ्यांबरोबर खरडा भाकरी खाल्ली त्यावेळी काँग्रेस नेते नितीन राऊतांना त्यांनी बोलवलं असतं तर बरं झालं असतं. आमदार बंटी पाटील त्या दिवशी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफांनी दिलेला शब्द पाळावा, मात्र नितीन राऊतंच शब्द पाळणार नसतील तर माझ्या पाळण्याबद्दल ते अपेक्षा का करत आहेत? असा सवाल मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

येणाऱ्या 25 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राहुल आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार आहे. दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचा संपूर्ण गट राष्ट्रवादीत विलीन होणार आहे. करवीर तालुक्यात आमचा पक्ष मर्यादित होता. आता शक्तिमान माणसं आल्यामुळे आमच्या पक्षाला बळ मिळेल.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी करवीरमधून आम्हाला ताकद मिळेल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर काँग्रेस निष्ठावंत राहुल आणि राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला.

काँग्रेस आमदार बंटी पाटलांना इतकं हळवं होण्याची गरज नव्हती, माजी आमदार संग्राम थोपटे, पृथ्वीराज पाटील अनेकजण भाजपमध्ये जात आहेत. दिवंगत आमदार पी.एन पाटील यांनी काँग्रेसची इमानी इतबारे सेवा केली. आता त्यांची मुलं भविष्यासाठी वेगळा विचार करत असतील तर त्यांना आपण आशीर्वाद द्यावेत, अपशकुन करू नये, असा टोला मुश्रीफांनी सतेज पाटील यांना लगावला.

राहुल पाटील यांनी आपले विरोधक नरकेच आहेत हे जाहीर केले आहे. पारंपारिक विरोधक असल्याने त्यांनी भूमिका घेतली हे योग्य आहे. कागलमध्येही समरजीत घाटगे यांनी अशीच भूमिका घेतली होती. आता जिल्ह्यात विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. आजच्या घडीला नरके आणि राहुल पाटील विरोधक असले तरी पुढच्या काळात ते दोघे मित्रही होऊ शकतात, असा दावा मंत्री मुश्रीफांनी केला.

गोकुळ दूध संघाबाबतचे स्पष्टीकरण कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. गोकुळ मोठा दुध संघ आहे.अशा छोट्या गोष्टीतून संचालक मंडळ बरखास्त करा ही मागणी कितपत योग्य आहे. आमची सत्ता आल्यानंतर दूध उत्पादकांना भरघोस दरवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यकाळात गोकुळ दूध संघ मोठी झेप घेणार आहे, याला कोणी अपशकुन करू नये अशी विनंती देखील मुश्रीफांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT