Praniti Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजना ही तर पॉलिटिकल स्टंटबाजी; निवडणुकीनंतर ती सावत्र होणार ’

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 August : लाडकी बहीण योजना ही एक पॉलिटिकल स्टंटबाजी आहे. भाजपची मानसिकता ही नेहमीच महिलांच्या विरोधातली राहिली आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर लाडकी बहीण ही कधीही सावत्र होण्याची शक्यता आहे, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेबाबत केला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरूल महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजना ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आणि स्टंटबाजी आहे.

या योजनेच्या माध्यमातून बहिणींचा सन्मान होत असेल, तर ठीक आहे. मात्र, भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली राहिली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण ही कधीही सावत्र होण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणीसोबत लाडका शेतकरी, लाडका कामगार असे अनेक लाडके आहेत. मात्र, लाडकी बहिण योजना ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. मध्यंतरी मध्यप्रदेश सरकारनेही ही योजना सुरू केली आहे. मात्र, लोक आता खूप हुशार झाले आहेत. हे खेळ फक्त इलेक्शनपुरते असतात, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात लवकरच महाविकास आघाडीचे स्थिर सरकार आलेले दिसेल, असा विश्वासही प्रणिती शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

मराठा आरक्षणबाबत प्रणिती शिंदे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात संतुलन बिघडवून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचं प्रयत्न होत आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मी लोकसभेतही मांडला आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे, त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही.

महिला आरक्षणापासून ते मराठा, धनगर आरक्षणापर्यंत जातीय जनगणनेशिवाय ते शक्य नाही. मात्र, हे सरकार त्यावर निर्णय का घेत नाही, हे मला माहिती नाही. देशातील वंचित लोकांना मुद्दाम देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचं कटकारस्थान भाजप करत आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

मोदी यांनी आज लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना विकसित भारताचे व्हिजन-2047 मांडले आहे. त्यावर प्रणिती शिंदे म्हणाल्या, मला पूर्ण खात्री आहे की, देशातील जनतेच्या योगदानामुळे भारत हा लवकरच सुपर पॉवर होणार आहे. आपली विचारसरणी ह सेक्युलर आहे, त्यामुळे भारत पुढे जातं आहे. मात्र ते फक्त एका माणसाचे श्रेय नसून अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनेक सत्ताधाऱ्यांचे ते श्रेय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT