Lahu Kanade
Lahu Kanade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लहू कानडे म्हणाले, भांडवलदार मित्रांची घरे भरण्याची मोदींची नीती...

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - देशात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती इंधनाच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी ट्विट करत टीका केली. त्यानंतर इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी आज श्रीरामपूर येथे इंधन दरवाढी विरोधात रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना लहू कानडे यांनी केंद्रातील भाजपवर जोरदार टीका केली. ( Lahu Kanade said, Modi's policy of filling the houses of capitalist friends ... )

Congress rally

प्रारंभी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाईमुक्त भारत अभियाना अंतर्गत श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षतर्फे आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. शिवाजी रस्त्याने जावून तहसील कायार्लयासमोर याचा समारोप करण्यात आला. याठिकाणी झालेल्या सभेला आमदार कानडे यांनी संबोधित केले. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलग, अंकुश कानडे, अशोक कानडे, अशोक बागुल, अनु.जाती सेलचे सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, जिल्हा सचिव समीन बागवान, श्रीरामपूर महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष अप्सरा शेख, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, किशोर बकाल, विष्णुपंत खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी निवेदन स्वीकारले.

आमदार लहू कानडे म्हणाले, केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हे भांडवलदार धार्जिणे आहे. श्रम करून घाम गळणाऱ्यांचे श्रम चोरणारे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवे उच्चांक गाठत आहे. उज्वला गॅस योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे, असा घणाघात काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, जीवनाश्यक वस्तू, गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील 20 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात 6.40 रुपयांची वाढ झालेली आहे. व्यावसायिक गॅस 5 महिन्यांमध्ये 720 रुपयांनी वाढला. केंद्रातील भाजपचे सरकार हे मूठभरांचे आहे. शेठजी-भटजींचे आहे. मोदी यांचे परम मित्र असलेले आदानी जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले. गोरगरीब लोकांवर भाववाढ करायची, त्याचबरोबर गोरगरीब लोकांनी घाम गाळून मिळवलेला पैसा त्यांच्या खिशातून ओरबाडायचा आणि आपल्या भांडवलदार मित्राला मदत करायची, त्यांची भरभराट होण्यासाठी मदत करायची ही अत्यंत दृष्टनीती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी सरकारचा धिक्कार करून थांबता येणार नाही तर काँग्रेस पक्षाची उज्वल परंपरा रचनात्मक आणि विकासात्मक काम करण्याची आहे. देश घडविण्याची परंपरा आहे. गोरगरिबांच्या पाठीशी राहणारी गरिबी हटवताना चलेजाव म्हणणारे आहे. तसेच गरिबी हटविण्यासाठी गरिबाला जगविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखून गोरगरिबांची कल्याणकारी विचारधारा आहे. आता ही विचारधारा बळकट करण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.

याप्रसंगी नाईक यांनी निषेध व्यक्त करुन केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागार्इचा आलेख जनतेसमोर मांडला. शेख यांनी जी.डी.पी. म्हणजे गॅस, डिझेल पेट्रोल वाढ असा उल्लेख करुन भाजप सरकारविरुध्द जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे सांगितले.

ससाणेंनी फिरविली पाठ

उक्कलगाव येथे झालेला वाद, त्यानंतर अंजुम शेख गट व आमदार कानडे यांच्यात वाढत्या जवळकीमुळे कानडे व ससाणे यांच्यात अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. या पाश्वर्भूमीवर आजच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे महासचिव करण ससाणे व त्यांच्या सहकार्यांनी पाठ फिरविल्याचे पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT