NDA V/S INDIA
NDA V/S INDIA sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MVA Vs Mahayuti : एक्झिट पोल खोटा! राज्यात आम्हीच 'किंग'; महायुती अन् आघाडीला भलताच कॉन्फिडन्स..

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत दणक्यात कमबॅक करणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून सांगण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्राने आघाडीला चांगली साथ दिल्याचेही बोलले जाते. हे अंदाज मात्र दोन्ही आघाडी आणि महायुतीने नाकारत पोलचे आकडे खोटे ठरतील, असा दावाही केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, शिरूर, मावळ, माढा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश होतो. या ठिकाणी 2019 मध्ये युतीला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. यावेळी बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सात जागा आघाडीला तर तीन जागा महायुतीला मिळणार आहेत.

राज्यात आघाडीला 25, महायुतीला 22 तर एक अपक्ष असा अंदाज पोलमधून वर्तवला आहे. मात्र आम्ही कमीत कमी 40 जागा जिंकत असून पश्चिम महाराष्ट्रात सात जागा आमच्याच असतील. देशात एनडीएला जसे यश मिळत आहे तीच स्थिती राज्यातही आहे. भाजप मिशन 45 च्या आसपास जाणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्त उमेश पाटील यांनीही त्यास दुजोरा देत महायुतीला 32 ते 35 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेत प्रचार केला. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी जोरदार प्रचार करत मतदारांपुढे विकासकामांचा लेखजोखा मांडलेला आहे. त्यामुळे राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पोलचे आकडे खोटे ठरून महायुतीला चांगले यश मिळेल. तसेच बारामतीची जागाही चांगल्या मताधिक्याने जिंकू, असेही पाटलांनी ठासून सांगितले.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पोलचे आकडे खरे नाहीत, असे म्हणताना दिसत आहेत. पोलने वर्तवलेल्या आकड्यांपेक्षा आम्ही पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात चांगली कामगिरी करू, असे स्पष्टच सांगत आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सर्व एक्झिट पोल हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असल्याचा दावा केला. त्यांचे आकडे काहीही असूद्या राज्यात आघाडीला 35 जागा मिळणार आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी सात जागा आघाडीला मिळतील, अशी खात्रीही वडेट्टीवार यांना आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, एक्झिट पोल हा फ्रॉड खेळ आहे. त्यामुळे आम्ही त्यांनी सांगितलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवत नाही. आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील. तर पश्चिम महाराष्ट्रात पोलपेक्षा जास्त संख्या असणार आहे. देशासह राज्यात भाजप आणि मोदी सरकारविरोधात वातावरण आहे. राज्यातील फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलेले नाही. त्यांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही राऊतांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT