Raju Shetti, Jayant Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 News : शिराळामध्ये शेट्टींचा बालेकिल्ला मजबूत, पण जयंत पाटलांच्या हाती चावी

Rahul Gadkar

Sangali News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन तालुके या मतदारसंघात समाविष्ट आहे. त्यातीलच एक म्हणजे शिराळा. सांगली शहरापेक्षा कोल्हापूर शहराला अधिक कनेक्टिव्हिटी असणारा तालुका शिराळा आर्थिकदृष्ट्या मजबूत बनत चालला आहे. पक्षांतर्गत विभागलेल्या या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आजही मजबूत आहे.

शेतकरी वर्गाचे प्रचंड संख्या असलेल्या या मतदारसंघाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची एकजूट कायम ठेवणे हे शेट्टी यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

सध्याच्या घडीला विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मानणारा मोठा गट शिराळा मतदारसंघात आहे. आमदार नाईक यांच्यापेक्षा पाटील म्हणतात ती पूर्व दिशा असे ठरवणारी कार्यकर्ते आजही या मतदारसंघात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अजूनही महाविकास आघाडीत जाण्यात तळ्यात-मळ्यात आहे. शेट्टी यांनी एकला चलो भूमिका घेतली असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघात उमेदवार देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Lok Sabaha Election 2024 News)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानीविरुद्ध महायुती अशी लढत झाल्यास या मतदारसंघातील कल शेट्टी यांच्या बाजूने राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर या मतदारसंघावर महायुतीकडून सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांची ताकद महत्त्वाची मानली जाते. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.

सध्या ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघातील गणित अवलंबून असणार आहेत. त्याशिवाय ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार दिल्यास हातकणंगले येथील लढत तिरंगी होईल. या मतदारसंघात मात्र राजू शेट्टी यांना फटका बसेल. जर ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्याचा फायदा महायुतीला होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व भाजपचे वर्चस्व आहे. लोकसभेचे संभाव्य उमेदवार भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित नसल्याने मतदारसंघातील सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघातील राजकारण हे एकीकडे आणि सर्वसामान्य लोक एकीकडे असे सध्याचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार नाईक व शिवाजीराव नाईक तर भाजपच्या माध्यमातून देशमुख व महाडिक एकत्र आले आहेत. त्यामुळे दोघांनी आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. शेट्टी यांनी या मतदारसंघात गत निवडणुकीचा पराभव पचवत लोकांशी वेगवेगळ्या कारणाने संपर्क सुरू ठेवला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी विविध विकासकामांची मंजुरी आणून अनेक गावांत निधी खर्च केला आहे.

या मतदारसंघात शेतकरी वर्गात शेट्टींची क्रेज आहे. युवा मतदारांत खासदार माने यांचा प्रभाव आहे. गत निवडणुकीत भाजप म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांना मदत केली होती. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना आघाडीचा धर्म म्हणून शेट्टी (Raju Shetty) यांना साथ द्यावी लागेल असे दिसते. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमकी भूमिका काय घेणार? यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे हे निश्चित आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT