sanjay mandlik shahu maharaj sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात चर्चा दोन धरणांची, उतराई कोणावर?

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanagale Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. कोल्हापूरमधून महायुतीकडून प्राध्यापक संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीकडून राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्य तत्परतेने आजही कोल्हापूर जिल्हा सुजलाम आणि सुफलाम आहे. त्याचीच उतराई म्हणून यंदा कोल्हापूर लोकसभा निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

राजर्षी शाहू महाराज ( Rajarshi Shahu Maharaj ) यांची उतराई करण्यासाठी शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने भावनिक वातावरण तयार केले आहे, तर दुसरीकडे खासदार मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांचे वडील लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक ( Sadashivrao Mandlik ) यांच्याही कामामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भाग सुजलाम आणि सुफलाम आहे. लढाई दोन प्रमुख पक्षात वैचारिक असली तरी त्याची झळ आता कोल्हापूरच्या धरणांपर्यंत आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ( Radhanagari Dam ) आणि काळम्मावाडी धरणाची ( Kalammawadi Dam ) चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेची जनता उतराई कोणावर करणार ही विचारण्याची वेळ मतदारांवरच आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे पार्श्वभूमी

कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखले जाते. हा जिल्हा पाणीदार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी महत्त्वाची मानली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यजवळ बांधण्यात आलेल्या राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर भाग सिंचन क्षेत्राखाली येऊन ऊस पट्ट्याला त्याची मदत झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील उत्तर भाग शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न करण्यासाठी हे धरण महत्त्वाचे ठरले आहे, तर कोल्हापूरच्या दक्षिण भागात काँग्रेसच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi ) यांच्या हस्ते काळम्मावाडी धरणाची पायाभरणी झाली होती. त्यानंतर झालेल्या सत्तांतर आणि बदलानंतर काही काळ गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) यांनी पाणी पूजन केल्याचे सांगितले जाते. दरम्यानच्या काळात काळम्मावाडीच्या उजवा आणि डावा कालव्यावरून बराच वाद झाला. उजव्या कालव्यातून कोल्हापुरातील दक्षिणी भाग आज सिंचनाखाली आला असून त्या पट्ट्यातील शेतकरीही आर्थिक संपत्तीने समृद्ध झाला आहे, तर डाव्या कालव्यातून भोगावती नदीपात्रात पाणी आणण्यासाठी तत्कालीन खासदार लोकनेते माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. जवळपास 28 टीएमसी असलेल्या धरण साठ्यातून दहा टीएमसी पाणी डाव्या कालव्यातून सोडले जाते.

सुरू झालं राजकारण....

सध्या ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडून राधानगरी धरणाला धरून प्रचार केला जात आहे. त्याचपद्धतीने खासदार मंडलिक यांच्याकडून स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी काळम्मावाडीच्या डाव्या कालव्यातून आणलेल्या पाण्याच्या प्रयत्नाबद्दल प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीकडून राजर्षी यांच्या कामांची उतराई म्हणून शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे, तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आव्हान केले जात आहे. मात्र, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनादेखील पूर्वजांनी केलेल्या कामावर आजही सकारात्मकता दाखवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार नेमकी उतराई कोणावर करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

( Edited By : AKshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT