Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News: मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांची टोलेबाजी; म्हणाले, माझं बोट धरून राजकारणात आले असते तर...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar On Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत जोरदार टोलेबाजी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी बारामतीतील एका सभेत बोलताना शरद पवारांचे कौतुक केले होते. यावेळी त्यांनी, "शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो" असे वक्तव्य केले होते. मोदींनी केलेल्या या वक्तव्याची अधूनमधून चर्चा होत असते. अशातच आता खुद्द शरद पवारांनीच (Sharad Pawar) या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. शिवाय पंतप्रधान माझे बोट धरुन राजकारणात आले असते, तर मी त्यांना असले काम करू दिले नसते असं पवार म्हणाले. ते बारामती (Baramati) येथील शेतकरी-कामगार मेळाव्यात बोलत होते.

या मेळाव्यात बोलताना पवार (Sharad Pawar) म्हणाले, "आज दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडतंय ते वेगळं घडतंय. मोदीसाहेब प्रधानमंत्री आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केलं, "शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो." म्हणाले. मोदी (Narendra Modi) पार्लमेंटमध्ये कधी भेटले तर, अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे, पण करतात काय? धोरणं काय? कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला निघाली आहे. तुम्हाला झारखंड (Jharkhand) नावाचं राज्य माहितीये का? झारखंड नावाचं राज्य आहे. आदिवासींचं राज्य आहे. मोदींविरुध्द भूमिका घेतली म्हणून तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली देशाची राजधानी आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal) नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला. त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व बाहेरून लोक यायला लागले. चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत. कशासाठी? काही धोरणं त्यांनी आखली. धोरण आखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं. आताच सुप्रियाने सांगितलं की, पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण आखलं पाहिजे. शिक्षणाबद्दलचा विचार असेल, शिक्षणाचं सार्वत्रीकरण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण आखावं लागतं, शेतीच्या संबंधीचं धोरण आखावं लागतं.

एका फटक्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं

केंद्र सरकारच्या धोरणांवरती टीका करतानाच पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला. पवार म्हणाले, "मी शेती खात्याचा १० वर्ष मंत्री होतो, त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, शेतकऱ्यांच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन चौकशी केली. घरातील महिलांनी सांगितलं, मुलीच्या लग्नाचं डोक्यावर कर्ज होतं. ते फेडता आलं नाही, थकबाकीदार आले, सावकार आला, घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. अब्रूचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही. विष प्यायला आणि जीव दिला. हा मृत्यू कशामुळे झाला? कर्जबाजारीपणामुळे. हा कर्जबाजारीपणा कसा घालवायचा? सरकारने काही केलं पाहिजे. मुंबईला, दिल्लीला परत गेलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला, आणि एका फटक्यात देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ७० हजार कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. तुमच्या डोक्यावरचं ओझं बंद झालं. बडेबडे कारखानदार आणि उद्योगपत्यांचं कर्ज माफ होतं, पण जो काळ्या आईशी इमान राखतो, देशातल्या लोकांच्या दोन वेळेच्या अन्नासाठी मेहनत करतो, त्यांचं कर्ज माफ नाही करायचं? हे चालणार नाही. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं." असं म्हणत पवारांनी मोदी सरकारच्या अनेक धोरणांवरती टीका केली.

बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर लावून जनतेकडून १०० रुपये वसूल करतात आणि मग त्यातलेच सहा रुपये आपल्या खिशात टाकून म्हणतात मी तुम्हाला पैसे दिले. ही आहे मोदी गॅरंटी. जिथे सामान्य लोकांचे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून निवडणूकीत बटण दाबलं पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आमचा पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता आम्ही नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, पण तोच जुना कार्यक्रम घेऊन पुढे आलो आहे. असंही पवार यावेळी म्हणाले.

(Edited By - Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT