Raju Shetti, Udhav Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : ठाकरेंच्या मशालीने केली शेट्टींची गोची; स्वाभिमानीच्या अस्तित्वाचा प्रश्न...

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha News : महाविकासमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी दोन वेळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, महाविकास आघाडीत येण्याची अट घातल्यानंतर शेट्टी यांनी नकार देत 'एकला चलो'ची भूमिका जाहीर केली. वंचितने उमेदवार दिल्यानंतर गोची निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वाभिमानीच्या गोटात महाविकास आघाडीत जाण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे शिवसेनेकडून मशाल चिन्हाचा आग्रह होत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांची गोची झाली आहे. स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे की मशाल हातात घ्यायची, यावरून त्यांची कोंडी झाली आहे.

एकूणच चिन्हाच्या निर्णयावरून राजू शेट्टींच्या पाठिंब्याचा निर्णयही लटकला आहे. मात्र, दोन दिवसांत पाठिंब्याच्या निर्णयानंतरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. सुरुवातीला ''एकला चलो रे''ची भूमिका होती. महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच शेट्टी यांनी मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत प्रचारात आघाडी घेतली. ऊसदराच्या आंदोलनात कारखानदार आणि शासनावर दबाव टाकत गतवर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा फरक देण्याचे कारखानदारांकडून कबूल करून घेतले.

फरकाच्या रकमेपोटी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुमारे दीडशे कोटी रुपये द्यावे लागतात. कारखानदारांकडून रक्कम आदा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दिला असला, तरी आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लटकल्याने शेतकऱ्यांच्या हातात जादाची रक्कम पडू शकली नाही. प्रशासनाच्या मध्यस्थीने झालेल्या या तोडग्यानंतर पैसे मिळाले असते, तर शेट्टींच्या प्रचारात हा एक प्रभावी मुद्दा बनला असता. ऊसदर आंदोलन शेतकऱ्यांसाठी कसे नुकसानकारक ठरले, हे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होणार आहे.

उमेदवार आणि मत विभागणी लक्षात घेऊन स्वाभिमानीने महाविकास आघाडीतील केवळ शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र, राष्ट्रवादीचा काही प्रमाणात याला विरोध असल्याची चर्चा सुरू आहे. प्रचारात राष्ट्रवादीचे नेते स्वाभिमानीबरोबर दिसले, तर शेतकऱ्यांमध्ये पुन्हा टीका होऊ शकेल, असा स्वाभिमानीचा अंदाज आहे. त्यामुळेच केवळ ठाकरे गटाच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानीकडून आग्रह धरला जात आहे. असे असले तरी मशाल चिन्हाचा आग्रह शिवसेनेकडूनही धरला जात असल्याने शेट्टींची अडचण झाली आहे. दोन दिवसांत याप्रश्नी चित्र स्पष्ट होऊन लढतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वाभिमानीच्या अस्तित्वाचा प्रश्न

शेट्टींनी ‘मशाल’ हातात घेतली तरच विचार होईल, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या शेट्टी यांना हातात मशाल घेतली, तर स्वाभिमानीचे अस्तित्व राहील का? याची चिंता वाटते. ‘मशाल’ न्यायचीय घराघरांत लोकसभेनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राज्यात मोठे यश मिळवायचे आहे. मात्र, त्यासाठी लोकसभा निवडणुकीतच पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह घराघरांत पोहोचविण्यासाठी लोकसभा निवडणूक एक संधी आहे. त्यामुळेच ठाकरे यांच्याकडून मशाल चिन्हाचा आग्रह धरला जात आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT