Jayant Patil, Vishwajeet Kadam, vikramsinh Sawant, Sumantai Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali News : हे म्हणे शेतकऱ्यांचं सरकार... नुकसान हजार कोटींचं; मदतीचा प्रस्ताव 35 कोटींचा...

Umesh Bambare-Patil

Sangali News : अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करणार्‍या सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुन्हा अवकाळीने दणका दिला. यामुळे जिल्ह्यातील 32 हजार 782 शेतकर्‍यांच्या 16 हजार 559 हेक्टर क्षेत्रातील पिके वाया जाऊन तब्बल एक हजार कोटीहून अधिकचे नुकसान झाले. यावर अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील यांनी आवाज उठवला. मात्र, जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईपोटी अवघ्या 35 कोटींची मदतीची मागणी केल्यामुळे पालकमंत्री आणि आमदारसाहेब आम्ही जगायचं कसं... अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावा करतात. असे असताना हजार कोटींचे नुकसान होऊनही अवघ्या ३५ कोटींचा मदतीचा प्रस्ताव सांगली जिल्हा प्रशासनाने तयार केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन तीन आठवडे झाली तरी सांगली Sangali जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil, विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील यांनी आवाज उठवला. त्यानंतर अवकाळी नुकसानीची मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते.

अवकाळी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे गेल्या महिन्यासह डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष, डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला होता. यामध्ये शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आणि संघटनांच्या दबावामुळे कृषी विभागाने तातडीने नजर अंदाजचा अहवाल सरकारकडे पाठविला.

यामध्ये मिरज तालुक्यातील सर्वाधिक 9 हजार 792 शेतकर्‍यांचे जिरायत पिकाचे 760 हेक्टर, बागायत पिकाचे 187 हेक्टर, फळपिकांचे 4 हजार 487 हेक्टरचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील 2 हजार 250 शेतकर्‍यांचे 808.95 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, भाजीपाला, केळीच्या भागांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील फळ पिकांसह रब्बीच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

16 हजार 559 हेक्टर क्षेत्रातील फळपिकांसह रब्बी पिकांच्या सुमारे 32 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात द्राक्ष डाळिंबासह रब्बी पिकांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले असताना त्याबद्दल तुटपुंजी मदत मिळणार असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा करण्यात आल्याची टीका काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT