Jayant Patil:  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; जयंत पाटलांची माहिती

Rahul Gadkar

Sangli News: आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. याची प्राथमिक फेरी मातोश्रीवर झाली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. सोमवारी इस्लामपूर येथे राम मंदिर अक्षता कलशपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठीच प्रयत्न करीत असतो. महाराष्ट्रातील लोक आमची भूमिका मान्य करतील, अशी आशा आहे. चांगलं राज्य चालविण्यासाठी जनता आम्हाला आशीर्वाद देईल, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच माझा आणि संजय शिरसाट यांचा कधीही संवाद झाला नाही, मग त्यांना माझ्या मनातलं कसं कळणार, त्यांचा बोलण्याचा उद्देश मला माहीत नाही, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचं महाराष्ट्रात मोठं अस्तित्व आहे. ही अस्तित्वाची नाही, तर विचारांची लढाई आहे. सध्या देशाची स्थिती चिंताजनक आहे. ज्यांना वाटतं ते आमच्यासोबत यायचा विचार करतील. लोक आपल्याबद्दल सतत बोलत असतात, प्रत्येकाला उत्तर देत बसले तर कामं कधी करणार, असेही पाटील म्हणाले.

यावेळी जयंत पाटलांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, याआधीही एक-दोनदा मराठा आरक्षण देऊन झाले आहे. मात्र, आरक्षण दिल्यानंतर काही लोक कोर्टात जातात. त्यामुळे सगळ्या चाळणीतून टिकणारं आरक्षण मिळाले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत बसवून हे आरक्षण द्यावे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतील. गडबडीत निर्णय घेऊन चुका करू नका. रद्द न होणारं आरक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी घाई गडबड करू नका. आरक्षणानंतर कोर्टात कोण जाईल हे गृहीत धरूनच हे आरक्षण द्यावं, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये रामराज्य यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. राज्यकर्त्यांना जनतेची काळजी पाहिजे. राम मंदिर उभा राहतेय, याचा आम्हालाही सार्थ अभिमान. राम कोणत्याही पक्षाचा नाही. भाविकांचा राम आदर्श पुरुष आहे. निमंत्रणावरून वाद झाला, पण कुणाला बोलवायचे, हा न्यासाचा प्रश्न आहे. पण सर्वांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली, कुण्या एका पक्षाने देणगी दिली नाही, असंही पाटील म्हणाले.

रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता. पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जातोय, असा आरोप होतोय, हे खरे असल्याचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

गर्दी कमी झाल्यानंतर मीदेखील अयोध्येला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ३ व ४ जानेवारीला शिर्डीला पक्षाचे अधिवेशन होत आहे. पवारसाहेब स्वतः या अधिवेशनात असतील. नव्या वर्षाची सुरुवात चांगली आणि उत्तम होईल, अशी मला खात्री असल्याचे पाटील यांनी सांगितले.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT