Maloji Raje Chhatrapati
Maloji Raje Chhatrapati sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अज्ञातवासातील मालोजीराजे सक्रिय झाले अन्‌ महाआघाडीतील नेत्यांची धाकधूक वाढली!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे पुन्हा एकदा कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur) राजकारणात सक्रिय झाले आहेत. उत्तरच्या पोटनिवडणुकीतील निकालानंतर त्यांनी काढलेली स्वतंत्र रॅली, त्यातील जल्लोष व अलीकडे शहरातील काही प्रमुख कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती पाहता ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 'महाविकास'च्या नेत्यांची धाकधूकही वाढली आहे.

मालोजीराजे हे त्यावेळच्या कोल्हापूर शहरमधून काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. तत्पूर्वी ते राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही (NCP) निवडणूक एकत्र लढवली होती. ही जागा काँग्रेसला गेल्याने एका रात्रीत मालोजीराजे यांचा काँग्रेस प्रवेश झाला आणि ते विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा त्यावेळी नवख्या असलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ ला त्यांनी उमेदवारीसाठी फारसी उत्सुकता दाखवली नसल्याने काँग्रेसने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली.

मात्र, २०१९ मध्ये काँग्रेसकडून ते इच्छुक होते. आपल्याला किंवा पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात ताकद नव्हती. म्हणून काँग्रेसने उद्योजक कै. चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली. कै. जाधव यांचे अकाली निधन झाल्याने या मतदारसंघत पोटनिवडणूक झाली. त्यात मालोजीराजे जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांच्या प्रचारात केवळ सक्रिय नव्हते, तर मैदानातच उतरले होते. या निवडणुकीत जाधव यांचा विजय झाला आणि मालोजीराजे हेच 'किंगमेकर' म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढली. 'उत्तर'चे 'उत्तर मालोजीराजे' हेच दाखवून दिले. किंबहुना तसे फलक त्यांच्या रॅलीत दिसले होते. दोन दिवसांपूर्वी मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीने शहरात काढलेल्या रॅलीतही त्यांचा सहभाग दिसला. या पार्श्‍वभूमीवर ते २०२४ च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार असतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आघाडी होणार का हाच प्रश्‍न

राज्यात सध्या शिवसेना (shivsena), काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. विधानसभेला हे तिन्हीही पक्ष एकत्र लढणार का नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. राज्याचा विचार करता तिन्हीही पक्षांना स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही. तसे झाल्यास मालोजीराजे यांना उमेदवारी मिळणार की पुन्हा जाधव यांना हे आताच सांगणे अवघड आहे. त्यात ऐनवेळी दुसऱ्या एखाद्याच्या गळ्यातही उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मालोजीराजे यांनी सुरू केलेल्या तयारीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच धाकधूक वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT