Satara News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठाम भूमिका घेतली जात नाही. यासाठी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या पाठिशी रहावे, अन्यथा याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा इशाराच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना दिला आहे. ते शनिवारी रात्री सातारा जिल्ह्यातील वाई येथील सभेत बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावेळी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची सातारा जिल्ह्यातील वाई येथे सभा पार पडली. यावेळी बोलनाता जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आणि गरीब मराठा समाजाच्या मुलांचे कल्याण करण्यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी आमच्या पाठीशी राहावे. हा मराठा समाज तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही.
मात्र, जर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास अडथळा आला. तर हा मराठा समाज तुम्हाला चांगलच लक्षात ठेवेल आणि तुम्हाला याची मोठी किंमतही चुकवावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जर सरकारने मराठ्यांना 24 डिसेंबरला ओबीसीमधून आरक्षण नाही दिले, तर आम्ही लढायला सज्ज आहोत, असा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. माझा जीव गेला तरी चालेल मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ओबीसी समाजाच्या नेत्यांनी उगाचच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाले.
मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणाची लढाई लढत असताना संयम बाळागायला हवा, राज्यात अनेक ठिकाणी मराठा तरुणांनी आरक्षण मिळेना म्हणून हताश होत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. तुम्ही असे आत्महत्या केल्या तर मग आम्ही उपोषण आणि आंदोलन कोणासाठी करत आहोत? त्याचा उपयोग काय असा सवाल जरांगे यांनी मराठा तरुणांना केला.
शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा पार पडल्या. सातारा, मेढा आणि वाई येथे झालेल्या सभापैकी वाई येथील सभेला सातारा येथील सभे पेक्षा जास्त संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मनोज जरांगे यांनी १ डिसेंबरपासून गावागावत साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले, तसेच मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत गाफील न राहता शांततेच्या मार्गाने आंदोलने सुरू ठेवण्याचेही आवाहन यावेळी केले. दरम्यान, वाई येथील सभेनंतर मनोज जरांगे हे किल्ले रायगडकडे मार्गस्थ झाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.