Balbheem Rakhunde.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation: सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी! आरक्षण मिळत नसल्यानं मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडेंची आत्महत्या

Deepak Kulkarni

Karmala News : मराठा आरक्षणावरुन सध्या महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलकांनी गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. बेमुदत उपोषणं, रॅली, सभा, दौरे, मेळावे यांच्यासह अनेक मार्गांनी जरांगेंनी सरकारवर आरक्षणासाठी दबाव टाकला. सरकारने मराठा 10 टक्के आरक्षण दिले आहे. पण जरांगेंनी सगेसोयरे याअटीसह ओबीसींच्या कोटीतून आरक्षण द्या अशी मागणी लावून धरली आहे. जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाची धार टोकदार केली असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून माजी नगरसेवक व मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटलांच्या पाठीमागे पूर्ण ताकद पणाला लावणार्या राखुंडे यांनी अशाप्रकारे आत्महत्या करत जीवन संपवल्यामुळे मराठा समाजातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माजी नगरसेवक व मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहीत राहत्या घरी आत्महत्या केली आहे. राखुंडे यांच्या आत्महत्येमुळे मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राखुंडे यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे,आमचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे असल्याचं म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आपल्या पूर्ण ताकदीनिशी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. पण त्यांच्या सगेसोयरे आणि ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सरकार दरबारी प्रलंबित अवस्थेत आहे. पण गेल्या काही दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आपलं जीवन संपवलं आहे.

माजी नगरसेवक व मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणासाठी लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांनी याआधीच महायुती सरकारला अल्टिमेटम दिला होता.पण दिवसागणिक मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातून टोकाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणावरुन सरकारची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. 29 ऑगस्टला निवडणुकीच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, विधानसभा निवडणूक एक महिना पुढे गेल्याने आपली भूमिका नंतर जाहीर करणार असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

'महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुकांनी आपली भेट घेतली आहे. मला वाटलं होतं मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील पण पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे', असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT