Aaditya Thackeray, CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aaditya Thackeray : '...तर आपलं मंत्रालयही गुजरातला नेण्यात येईल' : आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला डिवचलं

Deepak Kulkarni

Kolhapur News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी (ता. 10) शिवसेना 16 आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय देणार आहेत. या निर्णयाकडे राजकीय क्षेत्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटाकडून या निर्णयावरून दावे - प्रतिदावे केले जात असतानाच दुसरीकडे आता माजी मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान करीत खळबळ उडवून दिली आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे हे मंगळवारी (ता. 9) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यात त्यांनी शिवसेना 16 आमदार अपात्रतेवर (Shiv Sena MLA Disqualification Case) निकालावरही थेट भाष्य केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. जे रोजगार आपल्या राज्यात येणं अपेक्षित आहे ते त्यांच्या आवडत्या राज्यात पाठवत आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल म्हणून तयार आहे. मात्र, उद्घाटनासाठी अद्याप त्यांना वेळ मिळत नाही.

गेल्या आठ महिन्यांपासून दिघा रेल्वे स्टेशन बांधून तयार आहे. मात्र त्याचाही उद्घाटन ते करत नाहीत. आपण अन्याय का सहन करतोय, हा प्रश्न मी तरुणांना विचारण्यासाठी आलेलो आहे.

तसेच राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात असल्याचा आरोप करतानाच ते म्हणाले, सगळं गुजरातला पळवणार होता, तर सरकार का मारलं? राज्यातलं सरकार टिकल्यास आता आपलं मंत्रालयदेखील गुजरातला नेण्यात येईल, अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना चिमटा काढला.

आदित्य ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले. देशामध्ये संविधान टिकणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रश्न फक्त आमचा नसून संपूर्ण जग हा प्रकार पाहत आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात नार्वेकर आपलं नाव खराब करून घेणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इतके घाणेरडे राजकारण...'

जे निष्ठावंत आहेत ते सोबत आहेत आम्ही त्यांना पुढे घेऊन जाऊ. पण त्यांनी गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) वक्तव्याचा विचार करावा. राजकीय पक्ष फोडून करिअर संपवून आणि परिवार फोडून भाजपने काय मिळवलं. सत्ता गेलेल्याचं दुःख नाही. तुम्ही पक्ष आणि सत्ता चोरली. एवढं करूनदेखील तुम्ही राज्यातील युवांना रोजगार देऊ शकत नाही. अनेक रोजगार गुजरातला घेऊन जात आहे. इतके घाणेरडे राजकारण माझ्या आयुष्यात मी कधीही पाहिलेलं नाही, असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला आहे.

...तर 40 गद्दार अपात्र होतील!

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार बाद होऊन अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच दुसरीकडे उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असेही सांगितले. या प्रकरणात राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की महाराष्ट्रहिताचा निर्णय घेतील, याचा फैसलासुद्धा होईल, असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT