Devendra Bhuyar News, Raju Shetty News, Swabhimani Shetkari Sanghatana News
Devendra Bhuyar News, Raju Shetty News, Swabhimani Shetkari Sanghatana News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

स्वाभिमानीत फूट? राजू शेट्टींच्या विरोधात त्यांचाच एकमेव आमदार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. या मुद्द्यावर संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे शेट्टी विरुद्ध भुयार असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. यातून स्वाभिमानीत फूट पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Raju Shetty News)

महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय संघटनेने सामूहिकरीत्या घेतला होता. येत्या 5 एप्रिलला संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी यांनी जाहीर केले आहे. पूरग्रस्तांचे प्रश्न, दोन टप्प्यांतील एफआरपी, वीजकपात आणि वीजबिल वसुली या मागण्यांसाठी संघटना लढत आहे. परंतु, आम्ही सरकारमध्ये असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, अशी खंतही शेट्टींनी व्यक्त केली.

यावर आमदार भुयार यांनी मात्र, वेगळी भूमिका घेतली आहे. स्वाभिमानीच्या 5 एप्रिलच्या राज्य कार्यकारिणीनंतर निर्णय घेण्याचे भुयार यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीबाबत त्यांनी मवाळ भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, भाजपला जे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते महाविकास आघाडी सरकारने सोडवले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव असे प्रश्न सरकारने सोडवले आहेत. आता संघना कुठल्या मुद्द्यावर आघाडीतून बाहेर पडणार याचे कारण द्यावे लागेल. स्वाभिमानीचे आघाडीशी कुठल्या मुद्द्यावर बिनसले हे मला माहिती नाही. पण निर्णय घेताना मला विश्वासात न घेतल्यास मी माझा निर्णय घेईन. मी त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीत राहू शकतो.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 5 एप्रिलला कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीतच आघाडीत राहायचे की नाही, यावर शिक्कामोर्तब होईल. शेट्टी यांनी संघटनेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांना यादिवशी हजर राहण्याची सूचना दिली आहे. कोल्हापूरातील मार्केट यार्डमध्ये ही बैठक होणार असून, राजू शेट्टी त्यामध्ये ठाम भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचवेळी भुयार यांच्याबाबतही शेट्टी निर्णय घेऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

भुयार हे निवडून आल्यापासूनच संघटनेत सक्रीय नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर सोशल मीडियातही त्यांनीही स्वाभिमानीपासून फारकत घेतल्याचे दिसते. स्वाभिमानीच्या आंदोलनांमध्येही ते दिसत नाहीत. याबाबत खुद्द राजू शेट्टी यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भुयार यांनी राष्ट्रवादीला अधिक जवळ केल्याचे मागील वर्षीपासून दिसू लागले आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अमरावतीत पार पडलेल्या परिवार संवाद यात्रेत भुयारही सहभागी झाले होते. व्यासपीठावरील त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी पाटील यांनीही भुयार आमचेच आहेत, असे म्हणत एकप्रकारे शेट्टी यांनाच आव्हान दिले होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT