Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसलेच...

Vijaykumar Dudhale

Barshi, 12 September : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमदार राजेंद्र राऊत हे आज संध्याकाळी सहापर्यंत उपोषण करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची राऊत यांची मागणी आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यात गेल्या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यात जरांगे पाटील यांनी बार्शीत येऊन सभा घेणार असल्याचे आव्हान राऊत यांना दिले हेाते. त्यानंतर राजेंद्र राऊत हे आक्रमक झाले होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात रान उठवले होते.

बार्शीतील अण्णा शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अकरा प्रश्न विचारले होते. मात्र, त्या प्रश्नांची उत्तरे न दिल्याने अण्णा शिंदे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक दिवस उपोषण केले होते. त्या उपोषणाच्या वेळीही जरांगे पाटील यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे बार्शीतून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आठवड्यात दुसऱ्यांदा उपोषण, आंदोलन होत आहे.

दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन पत्र लिहून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.

विधानसभेचे विशेष अधिवेशन न बोलाविल्याने आमदार राजेंद्र राऊत यांनी आज (ता. १२ सप्टेंबर) बार्शीतील शिवसृष्टीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. राऊत हे आज संध्याकाळी सहापर्यंत स्वतः आंदोलन करणार आहेत.

आंदोलनाबाबत आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, राज्यातील गरवंत, माता, बंधू, भगिनींना, मराठा समाज बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. बांधवांनो आता कुणाला फसायचं नाही. आता कुणावरच विश्वास ठेवू नका, जे कोणी राजकारण करणारे वाटतात, तो भाग वेळा. आता फक्त एकच मागणी करा.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलावा आणि सर्व आमदारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तर द्या म्हणावं आणि नाही असेल नाही म्हणायचे, त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल.

मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्न येत नाही. पण, मराठा बांधवांनो आता कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. विशेष अधिवेशनात आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि फिरून फिरून कुठल्या तरी अधिसूचना काढू नका, अशी मागणीही आमदार राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT