Rohit Pawar
Rohit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

Amit Awari

अहमदनगर : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक खर्डातील किल्ल्यांवर सर्वांत मोठा स्वराज्यध्वज उभारण्यात आला. हा कार्यक्रम राजकीय नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट केले. या कार्यक्रमाला कोणीही मोठे राजकीय पुढारी निमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र तरीही या कार्यक्रमातून रोहित पवार यांनी अनेक राजकीय विरोधकांना घायाळ केले आहे. MLA Rohit Pawar injured many birds with one arrow...

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघाची भूमी ही भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे. त्यातही खर्डा किल्ला हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला. हैद्राबादच्या निजामाचे राज्य अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत होते. अहमदनगर जिल्हा मात्र मराठ्यांकडे होता. जामखेड तालुक्यात होळकरांची जहागीर होती. अहल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीही याच मतदार संघात आहे. कर्जत, जामखेडमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. पारनेर, नगर शहर शिंदे कुटूंबाकडे होते. खर्डा किल्ल्यावर मराठ्यांनी हैद्राबादच्या निजामचा 11 मार्च 1795ला पराभव केला. हा मराठा साम्राज्याचा शेवटचा विजय होता. या विजयानंतर अहमदनगर शहर 1803ला तर 1 जानेवारी 1818ला पुणे इंग्रजांनी जिंकलं.

कर्जत-जामखेड हे इंग्रजांच्या मुंबई प्रांताच्या सीमेवरील तालुके. हे दोन्ही तालुके दुष्काळी. त्यामुळे सीमावर्ती भागाकडे इंग्रजांचे जरा दुर्लक्ष्यच झालं. भारत स्वातंत्र्यानंतरही या भागात विकासाची गंगा आलीच नाही. तत्कालीन मंत्री आबासाहेब निंबाळकरांचे प्रयत्नही अपुरे ठरले.

1990च्या सुमारास देशभर सुरवातीला मंडल कमिशनचे व त्यानंतर कमंडलचे वारे वाहू लागले. कर्जत-जामखेड मतदार संघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने सुरवातीला मंडल व नंतर कमंडलच्या राजकारणाचे थेट परिणाम दिसू लागले. या मतदार संघात युतीकडून माधव पॅटर्न राबविला गेला. या भागात हळूहळू शिवसेना-भाजपने आपले पाय रोवले. आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदा व पंचायत समिती पुर्ते सीमित केले. सुरवातीला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व नंतर भाजपचे राम शिंदेनी आमदारकी मिळविली.

पुढे सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले तर राम शिंदेही दोन वेळा आमदार झाले. यात एक वेळा राम शिंदेना पाच वर्षे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होता आले. मात्र तरीही कर्जत-जामखेडचा विकास होईना. अहमदनगर ते चापडगाव या रस्त्याचीही साधी दुरवस्ता दूर झाली नाही. विकास झाला तो केवळ चौंडीचा. त्यामुळे मतदारांत नाराजी वाढत गेली. यातच आता राम मंदिर बांधण्याचे काम सुरू झाल्याने तोही प्रचाराचा मुद्दा राहिलेला नाही.

मतदारांच्या नाराजीचा फायदा घेतला बारामती अॅग्रोच्या रोहित पवारांनी. पवार म्हणजे विकास हे बारामती व पिंपरी चिंचवडने दाखवून दिले होते. त्यामुळे पवार कुटूंबातील रोहित पवार निवडणूक लढणार म्हणताच मतदारांना विकासाची स्वप्ने पडू लागली. रोहित पवारांनीही विकासाचेच राजकारण करणार असे निवडणूक प्रचारात सांगितले. त्यामुळे मतदारांचा कौल रोहित पवारांच्या पारड्यात पडला. भाजप-शिवसेनेचे धर्माचे राजकारण मोडित काढत तेथे रोहित पवारांनी विकासाचे राजकारण आणले.

त्यामुळे खर्डा येथील कार्यक्रमात रोहित पवार यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या. यात त्यांनी "मी विकासाचेच राजकारण करणार" व "धर्म व जातीचे राजकारण होऊ देणार नाही" ही दोन महत्त्वाची विधाने केली. याचा अर्थ स्पष्ट होता. त्यांनी भाजप व शिवसेनेला लक्ष्य केले.

हे लक्ष्य करतानच त्यांनी समतेचा संदेश दिला. यात छत्रपतीचे स्वराज्य हे कोण्या एका जातीचे अथवा धर्माचे नव्हते. अहल्यादेवी होळकरांचे कार्य कोण्या एका जातीसाठी नव्हते. संतांचे व महापुरुषांचे काम अखिल मानव जातीसाठी असते सांगत. मतदार संघातील जातीय राजकारणाला छेद दिला आहे.

या संदर्भात सकाळच्या नगर आवृत्तीचे प्रमुख प्रकाश पाटील हे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या भाषणातून भाजप व शिवसेनेला लक्ष्य केल्याचा अभिप्राय नोंदविता.

राजकारणा एवढेच समाजकारण

रोहित पवारांनी महाराष्ट्राला आपण केवळ राजकारणच नव्हेतर समाजकारणातही अग्रेसर असल्याचे दाखवून दिले. सर्वांना बरोबर घेत सर्वसमावेशक राजकारण व समाजकारण रोहित पवार करू पाहत आहेत. या संदर्भात अग्रेवनचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके म्हणाले, या कार्यक्रमातून रोहित पवारांनी सिद्ध केले की ते केवळ राजकारणीच नव्हेत तर समाजकारणीही आहेत. सामाजासाठी काहीतरी विधायक करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी या कार्यक्रमात राजकीय व्यक्तींना न बोलावता सामाजातील दिग्गज नागरिकांना आमंत्रित केले. त्यामुळे शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळेंप्रमाणे राजकारण व समाजकारण करणार असल्याचा संदेश त्यांनी या कार्यक्रमातून दिला आहे, असे पत्रकार नेटके सांगतात.

धर्म व वारकरी संप्रदाय

आषाढीवारीच्या काळात राज्य सरकारने कोविडचे कारण देत दिंडी सोहळे रद्द केले. या विरोधात भाजप व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार बंड्या तात्या कराडकर यांनी भुमिका घेत महाविकास आघाडीवर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ही स्वराज्य ध्वज यात्रा देशातील 6 राज्ये व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून गेली. सर्व धर्मातील 96 ठिकाणी ही यात्रा गेली. यात प्रमुख्याने वारकरी संप्रदायातील प्रमुख संतांच्या जन्म व समाधी स्थळांचा समावेश होता. शिवाय स्वराज्य ध्वज पूजन कार्यक्रमाला वारकरी संतांचे वंशज व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बोलावले. त्यांना पंचा व तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार अशोक झोटिंग सांगतात, आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमातून भाजप, शिवसेना व वारकरी संप्रदायाला सूचित केले आहे. वारकरी संप्रदायाला भाजप सोडून महाविकास विकास आघाडीच्या मागे उभे राहण्याचा संदेश दिला आहे, असे वाटत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार झोटिंग यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी खर्डा किल्ल्या समोर स्वराज्य ध्वज फडकविला असला तरी अजूनही या ध्वजापेक्षा ध्वजाच्या कार्यक्रमावर उलट सुलट राजकीय चर्चा रंगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT