Rajan Patil-Yashwant Mane-Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Umesh Patil : राजन पाटील, यशवंत मानेंना मोहोळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; उमेश पाटलांचा हल्लाबोल

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 September : मोहोळ तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध असतानाही माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांनी हेखेखोरपणाचा कळस गाठला आहे. त्यामुळे अहंकारी पाटील आणि आमदार मानेंना मोहोळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार आणि माजी आमदारांना दिला आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयाचे (Angar Upper Tehsil Office) कामकाज शुक्रवारपासून सुरू झाले आहे. तत्पूर्वी अनगर अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात आलेल्या 43 गावांपैकी पेनूर, पाटकुल आणि तांबोळे ही 3 गावे दळणवळणाच्या सुविधांच्या अभावामुळे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही गावे वगळून उर्वरीत 40 गावांसाठी हे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित झाले आहे.

उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, संपूर्ण अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी असताना ‘दळणवळण सुविधा नसल्याचे सांगून केवळ 3 गावे वगळण्याचा निर्णय हा दिशाभूल करणारा आहे. अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ठ 43 गावांपैकी 30 गावांतून कुठलीही सार्वजनिक वाहतूक तथा दळणवळण सुविधा नाही. दळणवळण सुविधांचा अभाव या निकषांवर 3 गावे वगळण्याचा निर्णय झाला असेल तर, त्याच आधारावर आणखी 27 गावे अनगर अप्पर तहसील कार्यालयातून वगळली पाहिजेत.

राहीलेल्या 13 गावांपैकी पवारवाडी, घोरपडी ही 2 बेचिराख गावे वगळल्यास अनगरसह फक्त 11 गावे शिल्लक राहतात. या 11 गावांमधूनही अनगरला जाण्यासाठी केवळ एसटी बसची सुविधा आहे. अनगरवरून परत येण्याची सुविधा नाही. एकूणच अनगर अप्पर तहसील कार्यालयाची निर्मितीच असैविधानिक आणि बनावट अहवालाच्या आधारावर झाली आहे, असा आरोप उमेश पाटील यांनी केला.

मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती यापूर्वीच उच्च न्यायालयात गेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकारी पातळीवरही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवणे अपेक्षीत होते. पण, अनगरकरांना त्यांच्या गावात तहसील कार्यालय सुरू करण्याची घाई झाली आहे, त्यासाठी ते प्रशासनावर दबाव आणून खोटे अहवाल लिहून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारशी पत्रव्यवहार

उमेश पाटील म्हणाले, भाजपचे विजयराज डोंगरे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यापूर्वी पेनूर आणि शेटफळ मंडल अनगर अप्पर तहसील कार्यालयातून वगळण्यासाठी सरकारशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे ही तीन गावे वगळली आहेत.

नेत्यांच्या भूमिकेत बदल नाही...

मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या स्थापनेनंतर त्यांनीही अनगर अप्पर तहसील रद्द करण्याचीच मागणी केली आहे. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीमधील सर्व प्रमुख नेत्यांच्या भूमिकेत कोणताही बदल नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT