ranjitsinh naik nimbalkar
ranjitsinh naik nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदार निंबाळकरांनी ऑनलाईन बैठकीचा उल्लेख केला भेंडीबाजार...!

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (ता. जानेवारी) सात रस्ता येथील नियोजन भवनात झाली. बैठकीसाठी अधिकारी, पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे नियोजन भवनात उपस्थित होते. समितीचे सदस्य मात्र ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. अनेक सदस्य एकाच वेळी बोलत असल्यामुळे माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांनी या बैठकीचा उल्लेख भेंडीबाजार असा केला. त्याला नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आक्षेप घेतला. त्यावर निंबाळकर यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. (MP Ranjit Singh Nimbalkar referred to the online meeting of DPC as bhendiBazaar')

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यामुळे बैठकीत एकाचवेळी अनेकांचे माईक सुरु होत होते. उत्तर ऐकण्यापेक्षा प्रश्‍न मांडण्यासाठी अनेक सदस्यांची धडपड सुरु होती. आजची बैठक म्हणजे भेंडीबाजार असल्याचा उल्लेख माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. त्यांच्या या उल्लेखावर नगरसेवक चंदनशिवे यांनी आक्षेप घेतला. गोंधळ होऊ नये, प्रत्येकाला प्रश्‍न मांडण्याची व उत्तर घेण्याची संधी मिळावी, यासाठी आपण असे बोललो, असे स्पष्टीकरण खासदार नाईक निंबाळकर यांनी दिले.

दरम्यान याच बैठकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनला अक्षरशः धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, ‘तुम्ही मला सांगा कोरोना लस सक्तीची आहे की ऐच्छिक. कोरोना लस न घेणाऱ्यांच्या सेवा, सुविधा जर राज्य सरकार बंद करत नसेल व त्याबाबतचा कोणताही आदेश देत नसेल तर तुम्ही कसा निर्णय घेतला? लस घेतली नाही म्हणून रेशन आणि पेट्रोल द्यायचे का बंद केले?’ आमदार शिंदे यांनी विचारलेल्या या प्रश्‍नांनी जिल्हा प्रशासनाची कोंडी झाली. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर आमदार शिंदे यांनी प्रश्‍न विचारले, ‘पालकमंत्री भरणे यांनी उत्तरासाठी माईक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हातात दिला आणि अनपेक्षितपणे झालेल्या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

आमदार शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लस सक्तीची नाही. लस घेतली नाही; म्हणून कोणाचेही रेशन बंद केले नाही. सरकारी कार्यालयात प्रवेश, पेट्रोल या सुविधांसाठी दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. आमदार शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्‍नात जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे यांनी अधिकची माहिती देत भर टाकली. नऊ हजार कुटुंबांचे रेशन बंद केल्याचे खरे आहे का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. ऑनलाईन पध्दतीने सभेत सहभागी झालेल्या बाराचारे यांचा रेंजमुळे अडखळल्याने त्यांचा हा प्रश्‍न तिथेच थांबला.

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सिध्देश्‍वर यात्रेचा विषय आजच्या बैठकीत काढला. यात्रा सुरळित पार पडावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. यात्रेचा निर्णय राज्य पातळीवरुन होईल, असे सांगत पालकमंत्री भरणे यांनी राज्य सरकारकडे बोट दाखविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT