Jayant Patil_vishwajeet kadam-sanjay patil
Jayant Patil_vishwajeet kadam-sanjay patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपला करेक्ट कार्यक्रमाची धास्ती : संजयकाकांनी मागितली जयंत पाटील, विश्वजित कदमांना भेटीची वेळ

सरकारनामा ब्यूरो

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पण, तो करताना महापालिकेप्रमाणे करेक्ट कार्यक्रम होऊ नये, यासाठी भाजप नेत्यांनी सावध डावपेच आखायला सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस नेते, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. झेडपीतील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्याची मागणी ते करणार आहेत. त्याबाबतची बैठक येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. (MP Sanjay Patil asked for an appointment with Jayant Patil and Vishwajit Kadam)

नाराज गटाच्या मागणीनुसार सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांकडून घेण्यात आला आहे. या पदाधिकारी बदलाची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत होती. मात्र, त्याला मुहूर्त मिळत नव्हता. त्यातच भाजपतील नाराज जिल्हा परिषद सदस्यांनी आघाडीच्या नेत्यांची व सदस्यांची भेट घेतली होती. त्यामुळे फडणवीस यांनी पदधिकारी बदलास हिरवा कंदिल दाखवला. पदाधिकारी बदलासाठी खासदार संजय पाटील यांचा गट आग्रही होती. त्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने फडणवीसांची भेट घेत हे पदाधिकारी बदलास मान्यता मिळविली होती.

माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार पाटील यांनी पदाधिकारी बदल करण्यास हरकत नाही. पण, धोका होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना केली होती. त्याची जबाबदारी संजयकाकांनी घेतली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षाच्या नेत्यांच्या सोबत बोलणी करण्यासाठी खासदार पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना सांगण्यात आले आहे. पदाधिकारी बदलास सहकार्य करावे, यासाठी संजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्‍वजित कदम यांची वेळ मागितली आहे. संजय पाटील यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष देशमुख असणार आहेत. येत्या दोन दिवसांत ही बैठक होईल, असे देशमुख यांनी सांगितले.

सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यास भाजपकडे सध्या पुरेसे संख्याबळ नाही. निवडणूक लागली आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ही राज्यातील महाविकास आघाडी एकत्र झाली तर भाजपचे मनसुबे धुळीला मिळू शकतात. त्यामुळे जयंत पाटील, विश्‍वजित कदम यांनी शब्द दिल्यानंतर बदलाबाबतची पुढची पाऊले भाजपकडून उचचली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी या दोन नेत्यांची आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनाही हे दोघे नेते भेटणार आहेत.

पदाधिकारी बदल बिनविरोध झाला तर भाजपला सहयोगी पक्ष, संघटना, गट, नेत्यांची फारशी अडचण राहणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्याशिवाय, अशी भूमिका भाजपला घेता येऊ शकते, त्यामुळे आधी विरोधकांकडून बिनविरोधचा शब्द घेण्याचा प्रयत्न संजयकाका पाटील करत आहेत.

आम्ही पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर तो आम्ही करतणार आहेत. त्यासाठी खासदार संजय पाटील यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे भेटीचा वेळ मागितला आहे. तो मिळाला की चर्चा होईल. त्यात काय होतेय, हे पाहूनच पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT