sanjay raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MP Sanjay Raut News : आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय; राऊत कडाडले !

Anil Kadam

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीच्या लोकांना बदल हवा आहे. तेच मेरिट घेऊन शिवसेना मैदानात उतरली आहे. जागावाटपाचा निर्णय झाला असतानाही कुणी मैत्रीपूर्ण भाषा करीत असेल तर तो त्यांचा अपरिपक्वपणा म्हणावा लागेल. सांगलीत शिवसेना लढण्यावर ठाम असून आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढवून जिंकू, असा गर्भित इशाराच खासदार संजय राऊत यांनी सांगलीत येत काँग्रेसला दिला. राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून, 35 पेक्षा अधिक जागा जिंकण्यात यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार राऊत हे शुक्रवारी सांगलीत दाखल झाले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दिल्लीत सांगलीची चर्चा होत आहे. सांगलीत काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटीलच दिल्लीत जाणार, याबाबत कोणतीही शंका नाही. सांगलीतील जागेबाबत काँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसांपासूनची भूमिका बघितली आहे. मात्र, ती राजकीय नेता म्हणून त्याचा आदर केला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या हक्काची कोल्हापूरची जागा काँग्रेसला (Congress) दिली. रामटेकसाठी हट्ट होता तीदेखील जागा दिली. अमरावती लोकसभा ही काँग्रेसला सोडली, मग आम्ही सांगलीत एक उमेदवार जाहीर केला, तर तुमचा एवढा अट्टाहास कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे. हे आम्हाला मान्य आहे. परंतु सांगितलेल्या लोकांना बदल हवा आहे, तेच मेरिट घेऊन आम्ही चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. आता कुणी मैत्रीपूर्ण भाषा करीत असेल तर तो त्यांचा अपरिपक्वपणा आहे. सांगलीत शिवसेना लढण्यावर ठाम असून, आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढवू, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला.

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत

मोदी सरकार 400 पारचा नारा देत असला तरी तो फसवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे टीकास्त्र खासदार राऊत यांनी सोडले. महाविकास आघाडी तीन पक्षांनी मिळून स्थापन झाली आहे. या आघाडीने अडीच वर्षे सरकार चालवले आहे. मात्र भ्रष्ट मार्गाने सरकार पाडण्यात आले, त्यामुळे केवळ हा रोष महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पसरला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विश्वजित विद्ववान नेते

लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेकडे जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद -पंचायत समिती सदस्य, नगरसेवक नाहीत तरीही सेना सांगलीसाठी हट्ट करत आहे. ते कसे जिंकणार, असा सवाल काँग्रेस नेते विश्वजित कदम करीत आहेत. त्याबाबत विचारले असता लोकसभा जिंकण्यासाठी असे पदाधिकारी असलेच पाहिजेत असे नाही. आत्तापर्यंत काँग्रेसकडे हे सर्व लोक होते. मग त्यांचा उमेदवार का निवडून आला नाही. विश्वजित कदम विद्वान नेते आहेत. मागील निवडणुकीत सेनेचे किती व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार याचाही कदम यांनी अभ्यास करावा, असा टोला लगावला.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT