Satara Dcc Bank, Udayasinh Patil Undalkar
Satara Dcc Bank, Udayasinh Patil Undalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

`वडिलांनी बॅंक मोठी केली... पण राष्ट्रवादीने जाण ठेवली नाही`

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो

सातारा : विलासराव पाटील-उंडाळकर काकांनी गेली ५०-५५ वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत काम केले. त्यांनी जे काम उभे केले ते मला पुढे न्यायचे आहे, त्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. किसन वीर आबांपासूनची जिल्हा बॅंकेत संचालकांच्या नंतर त्यांच्या वारसदाराला संचालक म्हणून सामावून घेण्याची परंपरा काकांच्याबाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळली नाही, त्याला माझा विरोध असल्याचे कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातील जिल्हा बॅंकेची निवडणूक लढणारे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विरुध्द उदयसिंह पाटील-उंडाळकर अशी लढत होत आहे. या मतदारसंघातून यापूर्वी (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर हे ५३ वर्षे संचालक होते. किसन वीर आबांच्यानंतर काकांनी जिल्हा बॅंकेची धुरा सांभाळत बॅंकेचे नाव देशात पोचविले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र पाटील यांना सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून होत होती.

या पार्श्‍वभूमीवर ॲड. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांनी ५३ वर्षे संचालक म्हणून काम केले. त्यांनी बॅंकेच्या माध्यमातून जे जे काम उभे केले आहे, ते पुढे चालवायचे आहे. त्यासाठी मी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहे. तसेच जिल्हा बॅंकेत अगदी किसन वीरांपासून तात्या, दादाराजेंच्यापर्यंत दिग्गज संचालकांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना काम करण्याची संधी दिली गेली. पण, काकांच्याबाबतीत तसे झाले नाही. जिल्हा बॅंकेची परंपरा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळली नाही. त्यामुळे मी निवडणूक लढत आहे.’’

पालकमंत्र्यांनी या मतदारसंघात संपर्क मोहीम राबवली आहे, तुमचा प्रचार कशा पध्दतीने चालला आहे, या विषयी ॲड. पाटील म्हणाले, ‘‘आमची माणसे फिरून काम करत आहेत. पण, ते पालकमंत्री असल्याने त्यांचे फिरणे व सभासदांना भेटणे दिसतेय. आमचेही कार्यकर्ते संपर्क ठेऊन आहेत. त्यामुळे निकाल २३ तारखेलाच कळेल.’’

भावनिक मुद्यावर निवडणूक लढत नाही

भावनिकतेचा मुद्दा या निवडणुकीत येऊ शकेल काय, याविषयी विचारले असता ॲड. पाटील म्हणाले, ‘‘भावनिक मुद्दा करून आम्ही निवडणूक लढत नाही. मी केलेले काम आणि काकांनी दिलेले योगदान यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातून मतदार काय समजायचे ते समजतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT