Narayan Patil
Narayan Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धरणग्रस्तांच्या सभांद्वारे नारायण पाटीलही तापवणार उजनीचे पाणी!

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : उजनी (Ujani Dam) पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी उजनी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा (Karmala) तालुक्यातील उजनी धरणग्रस्त गावांत १० ठिकाणी यासाठी सभा घेऊन लोकांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे, अशी माहिती माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी दिली. (Narayan Patil will know the problems of the dam victims in Karmalya)

इंदापूर (जि. पुणे) येथील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता माजी आमदार नारायण पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे.

याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी आपली घरे, शेतजमीन व गावांचा त्याग केल्यानंतर उजनी धरणाची निर्मिती झाली. आज उजनीच्या पाण्यावर पहिला अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा आहे. त्यांच्या भावना वा मत विचारात न घेता आज उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्यक्षात उजनीसाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची व्यथा त्यांच्या गावांत जाऊन आपण जाणून घेणार आहोत. उजनीच्या भविष्यातील सुस्थितीतील अस्तित्वासाठी आपण शेतकऱ्याला या नियोजनात सहभागी करून घेणार आहोत.

विद्यमान आमदारांनी करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांची फसवणूक केली असून याचे गंभीर परिणाम दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत, असा आरोपही नारायण पाटील यांनी केला. उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून उजनीकाठच्या दहा गावांमध्ये प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत जाणून घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. उजनी पाणी परिषदेचा हा नियोजित कार्यक्रम ता.२६ मेपासून सुरू होत असून ता ६ जून रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ता.26 मे (वांगी नं 3), ता. 27मे (उमरड), ता.28 मे (कंदर),ता.29 मे (चिखलठाण 1), ता. 30 मे (शेलगाव-वांगी), ता.31 मे (वाशिंबे), ता.1जून (केतुर 2), ता.2 जून (टाकळी), ता.3 जून (कोंढारचिंचोली), ता.4 जून (जिंती) अशा ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेच्या ठिकाणी आसपासच्या गावांतील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून या सर्व सभा झाल्यानंतर व प्रत्यक्ष धरणग्रस्तांचे मत विचारात घेऊन ता.६ जून रोजी जेऊर येथे पत्रकारांशी संवाद साधून माजी आमदार नारायण पाटील हे धरणग्रस्तांचे वतीने आपली भूमिका मांडणार आहेत. या उजनी परिषदेत धरणग्रस्त व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पाटील गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी व प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT