Sangli : Gram Panchayat Result
Sangli : Gram Panchayat Result  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील-आबा गटाने राष्ट्रवादीला सांगलीत बनविले ‘नंबर वन’: भाजपची मुसंडी; काँग्रेसची पिछेहाट

सरकारनामा ब्यूरो

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आधी राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची ‘लिट्मस टेस्ट’ मानल्या गेलेल्या ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीत (Election) सांगली (Sangli) जिल्ह्यात राष्ट्रवादीने (NCP) वर्चस्व राखले आहे. भाजपनेही (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. बिनविरोध ३१ सह ४४७ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने एकहाती १२९ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. भाजपने ११२, तर शिंदे गटाने (Eknath Shinde) ३४ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावत जोरदार धडक दिली. (NCP number one in Sangli; BJP wins second largest seats; Congress retreat)

काँग्रेसचे (Congress) प्राबल्य पलूस, कडेगाव, जत या तीन तालुक्यांपुरतेच उरल्याचे सिद्ध झाले. काँग्रेसने ६४ ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. हक्काच्या मिरज तालुक्यात काँग्रेसला साजेशी चांगली कामगिरी करता आली नाही. स्थानिक आघाड्यांची ६९ गावांत सत्ता आली, तर ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या निकालाबाबत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. एकमेकांचा दावा खोडून काढत आपलीच सत्ता असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे निकालानंतरही जुगलबंदी सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४४७ ग्रामपंचायतीत कारभारी ठरवण्याचा महायज्ञ नुकताच पार पडला. आगामी मोठ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गावगाड्याचा कारभार आपल्या समर्थकांच्या हाती असावा, यासाठी नेत्यांनी ताकद लावली होती. नेते प्रत्यक्ष प्रचारात नसले, तर रसद पुरवली गेली होती. आज त्याचा निकाल हाती आला आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत कुणापुढे काय आव्हान उभे असेल, याचा आराखडाही तयार झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे वाळवा, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांत निर्विवाद वर्चस्व राखले. हे चार तालुके आमदार जयंत पाटील आणि आबा गटाचे प्रभावक्षेत्र मानले जातात. तेथे भाजपनेही चांगली लढत देत भविष्यात प्रभावी आव्हान उभे राहणार, याचे संकेत दिले. याशिवाय, राष्ट्रवादीने मिरज तालुक्यात काँग्रेस फोडून वाढवलेल्या वेलीला फुले उमललेली दिसली. भाजपने मिरज, आटपाडी आणि जत तालुक्यात दमदार कामगिरी केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांची मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगली मशागत झाल्याचे चित्र समोर आले.

आटपाडीत देशमुख-पडळकर गटांनी एकत्र येत भाजपला चांगली मजल मारून दिली. आमदार पडळकर यांची आई पडळकरवाडी गावच्या सरपंच झाल्या. खानापूर तालुक्यात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी मोठी मुसंडी मारत ग्रामीण भागावरील आपला वरचष्मा कायम राखला. खानापुरात त्यांनी २३ गावांत सत्ता मिळवली. जत तालुक्यात ४, आटपाडी तालुक्यात ७ जागा जिंकत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ लक्षवेधी ठरली. ठाकरेंच्या शिवसेनेला अजितराव घोरपडे गटाच्या यशाच्या रूपाने कवठे महांकाळमध्ये सात, तर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी चिकुर्डे जिंकत आठवी ग्रामपंचायत सेनेला मिळवून दिली. काँग्रेसचे माजी मंत्री विश्‍वजित कदम यांचे पलूस, कडेगाव तालुक्यावरील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीतही स्पष्ट झाले. दोन्ही तालुक्यांत काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपला रोखले. आमदार विक्रम सावंत यांनी जत तालुक्यात काँग्रेसचा प्रभाव कायम राखला.

जिल्ह्यातील बलाबल

  • राष्ट्रवादी - १२९

  • भाजप - ११२

  • काँग्रेस - ६४

  • शिवसेना शिंदे गट - ३४

  • शिवसेना ठाकरे गट - ०८

  • आघाड्या व बिनविरोध - १००

- कुरळपमध्ये चाळीस वर्षांनंतर सत्तांतर

- पेठला भाजपच्या महाडिक गटाला धक्का

- माधवनगरमध्ये भाजपच्या शिवाजी डोंगरे गटाचा पराभव

- महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना ताकारीत धक्का

- आमदार विक्रम सावंत यांना स्वतःच्या गावात सुसलादमध्ये धक्का

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT