Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्याच्या विकासासाठी पवार पावरची गरज

संजय आ. काटे

Sharad Pawar : काही वर्षांपूर्वीची श्रीगोंद्याच्या विकासाची चढती कमाल आता खाली आली आहे. आवश्यक विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून किचकट विषयांवर चर्चा करुन वेळ मारुन नेण्याची चाल खेळणाऱ्या बहुतेक स्थानिक नेत्यांनी स्वत:चे संस्थाने वाढवलीत. आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही, असे नसले तरी या कामातील पाठपुरावा व दर्जा याचा अजूनही मेळ बसत नाही. मूलभूत प्रश्न भिजत ठेवून निवडणुकांचे राजकारण होत असल्याने विकासाचा थेट रिझल्ट मिळत नसल्याचे वास्तव आहे.

तालुक्यात साखर कारखान्यांमुळे मोठी क्रांती केली, हे नक्कीच खरे आहे. मात्र सगळेच कारखाने स्व-मालकीचे झाल्याचे दिसते. कारखान्यांच्या माध्यमातून गाळप व दर या दोनच संकल्पना पुढे आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तत्कालिन योजना राबविल्या तरी त्याचे पुढे काय झाले हे कारखानदारही सांगू शकत नाहीत.

या सगळ्या राजकारणात तालुक्यात काय विकास साधला, यापेक्षा अजून काय राहिले, याकडे कुणीही गांभिर्याने पाहत नाही. तालुक्यातून दोन हायवे गेले म्हणजे सगळा विकास झाला, असे म्हणता येत नाही. गाव व वाडीवर जाण्यासाठी खड्यांमध्ये गेलेले रस्ते कुणीही पाहत नाही. वीजेचे उपकेंद्रे वाढली, मात्र त्यापटीत शेतकऱ्यांच्या अडचणी व पिळवणूकही वाढली. महावितरणाचा अधिकारी व कर्मचारी पैशाशिवाय कामे करीत नाहीत, हे उघड सत्य नाकारता येत नाही.

तालुक्यात साखर कारखाने वगळता कुठलेही औद्योगिकरण झालेले नाही. तथापि श्रीगोंदे मतदारसंघातील नगर-दौंड महामार्गालगतची सुमारे सव्वा पाच हजार हेक्टर क्षेत्र एमआयडीसीच्या उपयोगी येणार असणारी परिस्थिती व तसा प्रस्तावही सादर झालेला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे प्रस्तावानंतर आदेश होवूनही स्थळ पाहणी सुध्दा झालेली नाही.

तालुक्यात खाजगी दवाखान्यांची वाणवा नसली तरी उपजिल्हा रुग्णालय अजूनही अस्तित्वात नाही. नागरीकांच्या आरोग्याबाबत नेते उदासिन असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिस उपविभागीय कार्यालय, महावितरण उपविभागीय कार्यालय तालुक्यात नाही. मंजूर झालेले कृषी महाविद्यालयही शेजाऱ्यांनी हिसकावल्याने श्रीगोंदेकरांची निराशा झाली. तालुक्यातील नेते स्वहिताचे राजकारणात गुंतल्याने मोठे प्रकल्प तालुक्यात येत नाहीत. त्यासाठी सकारात्मक भावना ठेवून एकत्रीत प्रयत्नांची आवश्यक्ता आहे मात्र दुर्दैवाने ते घडत नाही. त्यामुळे तालुक्यातही पवार कुटूंबाची पॉवर असावी, अशी सामान्यांची भावना आहे व ती विकासासाठी रास्त असल्याचे दिसते.

शरद पवार हे पॉलिटिकल मॅजेशीयन म्हणून ओळखले जातात. त्यांनी मनात आणले तर श्रीगोंद्यातील थांबणारा विकास ते सत्तेत नसतानाही करु शकतात. त्यासाठी येथील सर्वपक्षीय नेत्यांना ताळ्यावर आणण्याची ताकत त्यांच्यात आहे. आणि तरीही स्थानिक नेत्यांना जर विकासापेक्षा राजकारणातच इन्ट्रेस्ट असला तर शेजारी कर्जत-जामखेडमध्ये जे केले तो प्रयोग श्रीगोंद्यातही ते करु शकतात याची जाणीव येथील नेत्यांनी ठेवली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT