Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Onion Export Ban: शेतकऱ्यांची चेष्टा करताय का? शेट्टी भडकले; 26 फेब्रुवारीला बाजार समित्या राहणार बंद

Rahul Gadkar

Raju Shetti Kolhapur News :

केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारीला राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते Raju Shetti यांनी दिला.

सध्या केंद्र सरकार देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे. शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे सात बारा नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील. या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार आहे. यामुळे बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. देशातील बाजार समित्या या राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याकरिता शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्यातला प्रकार आहे, असे म्हणत शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

केंद्र सरकारने बाजार समितीवर प्रशासक न नेमता सध्या असलेल्या निवडणूक प्रक्रियेतही सुधारणा करून यामध्ये बदल करून संबंधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांच्या दबावाखाली कारभारावर नियंत्रण राहील. तसेच बाजार समितीत काम करणारे माथाडी, हमाल आणि व्यापारी यांच्याही प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधा, अवैध व भ्रष्ट कारभारावर आळा घालण्यासाठी नवीन धोरण यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठविली म्हणून अनेकजणांनी जाहिरातबाजी केली. मात्र, लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्याचे जाहीर केले आहे. व्यापारी, तस्कर व दलाल यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. यामुळे बाजार समिती व कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक दिली आहे. राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यातील सर्व बाजार समित्यांनी तसेच माथाडी, हमाल आणि व्यापारी यांनीही या आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT