India Aghadi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : शेट्टींना आघाडीत घेण्याबाबत स्थानिक पातळीवर बिघाडी; विरोध वाढला...

Rahul Gadkar

Kolhapur News : एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीसोबत यावी यासाठी जिल्हासह महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असे विधान केले असताना इंडिया आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना घेण्यास विरोध वाढू लागला आहे.

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विरोध केल्यानंतर त्यांना तडका फडकी जिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकलं होते. त्यामुळे इंडिया आघाडीची नेमकी भूमिका काय? याची कल्पना कार्यकर्त्यांना आली आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार राजू शेट्टी इचलकरंजी येथे मेळावा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 'जर त्यांना गरज नाही तर आम्ही त्यांच्या मागे कां पाळायचे. त्यांना गरज वाटली तर ते आमच्याकडे येतील. त्यांच्या मागे नाईलाज म्हणून आम्ही जाणार नाही', अशी संतप्त भूमिका इचलकरंजी येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा हक्काचा उमदेवार द्यावा. हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी इंडिया आघाडीकडून जो उमेदवार देण्यात येईल, त्याच्या पाठीशी एकत्रितपणे राहण्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. भावनिक प्रचाराला बळी न पडता मूलभूत विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगरसेवक सागर चाळके, संजय कांबळे, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, महादेव गौड यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT