Damaji Sugar Factory
Damaji Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘दामाजी’च्या सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळला; ऐन सणासुदीत दिली उसबिलाची रक्कम!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील संत दामाजी कारखान्यावर (Sugar factory) सत्ता स्थापन केलेल्या समविचारी गटाचे अध्यक्ष शिवानंद पाटील आणि उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने निवडणुकीत दिलेला शब्द पाळला आहे. या हंगामात गाळप झालेले ७ कोटी ५० लाख आणि मागील हंगामातील थकीत एक कोटी २३ लाख ऊस बिल (sugarcane) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. तसेच वाहतूक ठेकेदराची रक्कमही दिली आहे. ऐन सणासुदीत पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. (Paid sugarcane Bill dues of current season and previous season from Damaji factory)

दामाजी कारखान्यावर सुरुवातीच्या काळात संस्थापक (स्व.) कि. रा. मर्दा यांचे वर्चस्व होते, त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली (स्व) चरणू पाटील यांचे वर्चस्व राहिले. आमदार (स्व) भारत भालके याशिवाय आमदार समाधान आवताडे यांनीही एक टर्म सत्ता भोगली आहे. पण, त्यांनी निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याची पुर्तता करताना कारखान्याकडे इतर कोणतेही प्रकल्प नसल्याने दमछाक होते, असे अनेकदा सांगितले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत  आमदार आवताडे यांना समविचारी गटाने तगडे आव्हान देत सत्ता मिळविली. अध्यक्षपदी शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी पदाची जबाबदारी घेताना कारखान्याच्या खात्यावर केवळ तीन लाख रुपये शिल्लक होती, तर सुमारे १९८ कोटी कर्जाचा डोंगर घेत जबाबदारी स्वीकारली.

सध्या थकीत ऊस बिलामध्ये १ ते २५ मार्च दरम्यानचे कार्यक्षेत्रातील सभासद  आणि गेटकेन उसाचे बिल २१०० रूपयांप्रमाणे ७ कोटी ५० लाख ५८ हजार ११४ रूपये तसेच, २०२१-२२ च्या गळीत हंगामातील १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीतील मागील राहिलेले गेटकेनचे बिल १ कोटी २३ लाख १० हजार ७२८ रूपये धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. तसेच, हंगाम २०२१-२२ मधील १ नोव्हेंबर ते २५ मार्च हंगामअखेर कालावधीचे उर्वरित ऊस तोडणी वाहतुकीच्या बिलापोटी १ कोटी ६४ लाख ३२ हजार ४७० रुपये जिजामाता महिला पतसंस्थेत ठेकेदारांच्या खात्यावर अशी एकूण जवळपास १० कोटी रक्कम गौरी गणपतीच्या सणापूर्वी वर्ग केली आहे.

कामगाराचा पगार नियमित सुरु केला आहे. याच पगारातून कामगार पतसंस्थेकडे कामगाराच्या पगारातून कपात केलेला हप्त्याचा धनादेश दिल्यामुळे पतसंस्थेचा कारभार देखील रुळावर येऊ लागला आहे. भागभांडवलासाठी नवीन १० हजार शेतकऱ्यांना सभासद करण्यात आलेले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक  सभासदांना बॅंकेकडील पीककर्जासाठी लागणाऱ्या हमीपत्रासाठी कारखान्यावर जावे लागत होते. सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना खर्चिक व त्रासदायक होते. प्रत्येक गावाच्या ऊस उत्पादक गटात हमीपत्र देण्याची सुविधा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार नाहक त्रास वाचला आहे, हा निर्णय जवळपास कारखान्याच्या स्थापननेनंतर प्रथमच घेतल्याने हा निर्णय ऊस उत्पादकाच्या पसंतीला उतरला आहे.

नवीन सभासदांना देखील विम्याचे सरंक्षण देण्याची भूमिका अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केली आहे. अडचणीतला कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी शहरातील बॅंकाच्या प्रमुखांचे सहकार्य महत्वाचे ठरणारे आहे. कार्यक्षेत्रात पुरेशा ऊस उपलब्ध असल्याने नियोजनपूर्वक गाळप करुन कर्जरुपाने अडचणीत आलेली कारखान्याची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष खरात यांनी बोलून दाखविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT