Madhukarrao Pichad Vaibhav Pichad
Madhukarrao Pichad Vaibhav Pichad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांची साथ सोडली अनं पिचडांची ग्रहदशा बदलली?

अमित आवारी

Pawar Vs Pichad : राज्याचे लक्ष लागलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज झाली. यात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) व माजी आमदार वैभव पिचड यांना मतदारांनी नाकारले. त्यामुळे अनेक वर्षांपासून अगस्ती कारखान्यावर असलेली पिचडांची सत्ता गेली. पिचड पिता-पूत्र भाजपमध्ये गेल्यापासून त्यांचे एक-एक सत्तास्थान हळूहळू त्यांच्या हातून जाऊ लागले आहेत. आधी आमदारकी, मग ग्रामपंचायत आता तर साखर कारखानाही त्यांच्या हातून गेला आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राजकीय खेळी असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

अकोले तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. केवळ दोन वेळाच या तालुक्यात काँग्रेस व्यतिरिक्त पक्षाची सत्ता आली. यात 1957 च्या विधानसभेत नारायण गवळी यांचा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चिन्हावर तर 1967 ला बी.के. देशमुख यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली. हे अपवाद वगळले तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच सत्तेत राहिले आहे. यात यशवंतराव भांगरे तीन वेळा तर मधुकरराव पिचड सलग सात वेळा या मतदार संघातून आमदार झाले. वैभव पिचड हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घेऊन एकदा आमदार होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पिचड पिता-पुत्रांनी पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून पिचडांची ग्रहदशा फिरली.

अजित पवार यांनी अकोले मतदार संघातून वैभव पिचडांना पाडणारच असे जाहीर केले. या पूर्वी अहमदनगर जिल्ह्याने श्रीगोंदे विधानसभा मतदार संघात पवारांचा कहर काय असतो हे पाहिले होते. श्रीगोंद्याची पुनरावृत्ती अकोल्यात करण्यासाठी अजित दादांनी सभा घेण्यास सुरवात केली आणि 40 वर्षे अकोल्यात एकहाती सत्ता असलेल्या पिचडांच्या बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले.

अजित दादांच्या झेंजावाती सभांमुळे राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कधी नव्हे तो पिचडांचा पराभव झाला. कोरोनाचा संकटकाळ संपताच अजित दादांनी पुन्हा अकोल्यात लक्ष देण्यास सुरवात केली. पिचडांचे एककाळ मोठे समर्थक असलेले सीताराम गायकर, कैलास वाकचौरे, यशवंतराव भांगरेंचे चिरंजीव अशोक भांगरे, माकपचे नेते डॉ. अजित नवले अशी दिग्गज नेत्यांची मोट अजित दादांनी बांधली. सुरवातीला अकोले एज्युकेशन सोसायटी व नंतर अगस्ती सहकारी साखर कारखान्यात पिचडांना आव्हान उभे राहिले.

अगस्ती कारखान्याची निवडणूक लागताच अजित दादांनी प्रचारसभाही घेतली. मात्र अजित दादांची प्रचारसभा ज्या दिवशी झाली. त्याच दिवशी संध्याकाळी राज्य सरकारने ही निवडणूक स्थगित करण्याचा आदेश दिला. अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे अखेर काल ( रविवारी ) मतदान तर आज ( सोमवारी ) मतमोजणी प्रक्रिया झाली. यात पिचडांकडून त्यांच्या ताब्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना गेला. अजित दादांनी जमविलेल्या शिलेदारांनी पिचडांचा बालेकिल्ला उध्वस्त केला.

ग्रामपंचायतही गेली

पिचड हे राजूर येथे राहतात. राजूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीतही पिचड गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक वर्षे ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत गेल्याचे दुःख कमी होत नाही तोच हातातील कारखानाही पिचडांना गमवावा लागला आहे. मात्र सहा महिन्यापूर्वी अकोले नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत पिचडांनी सत्ता राखली होती.

आदिवासी संमेलनात निमंत्रण नाही

राज्याचे पहिले आदिवासी मंत्री व आदिवासी विभागाचे पहिले बजेट सादर करण्याचा मान मधुकरराव पिचडांना मिळवून देण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. नाशिक येथे सहा महिन्यांपूर्वी आदिवासींचे अधिवेशन झाले. या संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रमुख अतिथी होते. मात्र या संमेलनाचे साधे निमंत्रणही पिचडांना देण्यात आले नव्हते. पिचडांच्या जागी नरहरी झिरवळ हे संमेलनात दिसत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT