Prahlad Singh Patel
Prahlad Singh Patel Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prahlad Singh Patel : केंद्राच्या योजना राबविताना पक्षपात केला नाही

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Prahlad Singh Patel : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात योजना राबविताना कोणत्याही प्रकारे जाती, धर्माच्या आधारावर पक्षपात केला नाही. ज्या योजनांचे लाभ मिळण्यासाठी 10-20 वर्षे लागत होती त्यात पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सुसूत्रता आणल्याने लाभार्थ्यांना न मागता लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल ( Prahlad Singh Patel ) यांनी केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघ प्रवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या मेळावा तसेच पालिकेत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्था पदाधिकारी, व्यापारी उद्योजक संवाद मेळाव्यातही मार्गदर्शन केले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, प्रदेश प्रभारी रवी अनासपुरे, दीपक पटारे, नितीन किनकर, राजेंद्र गोंदकर, सुनील वाणी, प्रकाश चित्ते आदी उपस्थित होते.

पटेल म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानी होती. आज ती पाचव्या स्थानावर आणण्यात त्यांना यश आले. हे करत असताना ज्या इंग्रजानी आपल्यावर 125 वर्षे राज्य केले त्यांना सहाव्या स्थानावर पोहोचविले. 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आणणार असल्याचा संकल्प सरकारने केला आहे. मात्र, त्यासाठी उद्योग समूहांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

अर्थव्यवस्थेत लघू उद्योगांची संख्या 40 टक्के आहे. जुने 1400 कालबाह्य कायदे मोदी सरकारने संपुष्टात आणले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोकळीक दिली तर प्रशासन चांगले चालते. त्यामुळे त्यांना मोकळीक दिली आहे. मोदी सरकारने जनतेला न मागता घरे, शौचालये, वीज व आरोग्य यासारख्या योजनांचे लाभ पोहोचविले आहे. 2030 पर्यंत 70 टक्के महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

देशात सुमारे 24 लाख बचत गट आहेत. या माध्यमातून आपण अनेक पदार्थांची निर्मिती करतो. देशात, परदेशात खाद्य पदार्थ निर्मितीला मोठा वाव आहे. अनेक परदेशी कंपन्या आपल्याकडून स्वस्तात माल घेतात आणि यावरच कोट्यवधी रुपये कमवतात. देशात फक्त 117 अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. ते देशाची गरज सुद्धा भागवू शकत नाहीत तेव्हा जगाची कधी भागणार असा प्रश्न उपस्थित केला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार भकास आघाडी सरकार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा आयोजित केलेला आहे. या कालावधीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या सर्व अडीअडचणी सोडवाव्यात. आम्ही दौरा करतांना लोकांच्या अडचणी राहिल्या तर त्याला पदाधिकारीच जबाबदार असतील. तुम्हाला दिलेली पदे मिरविण्यासाठी नाहीत, असा सज्जड इशाराच त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवा, असे आवाहनही त्यांनी केली.

नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू होणार

नगर-मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात बेलापूरचे माजी सरपंच भरत साळुंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विखे यांनी मागील ठेकेदाराने 27 टक्के कमी दराने निविदी भरली होती. तसेच त्याला मुरूमाच्या गाड्या लावण्यासाठी तगादे सुरू होते. त्याला कंटाळून सदर ठेकेदार काम सोडून गेला. 470 कोटीची ही निविदा नव्याने 800 कोटीची निविदा काढली आहे. त्यामुळे जानेवारीत काम सुरू होईल. ते काम डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

35 हजार लघुउद्योगांना कर्ज देणार

देशात छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या 20 लाख महिला आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी दरवर्षी 35 हजार लघुउद्योगांना कर्ज देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. याचबरोबर जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकास पिण्यायोग्य 55 लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. असे असले तरी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT