Prasad Tanpure & Nitin Gadakari
Prasad Tanpure & Nitin Gadakari  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रसाद तनपुरेंचे नितीन गडकरींना भोजनाचे आमंत्रण : नगर-कोपरगाव रस्त्याच्या दुरवस्थेचा घ्या अनुभव...

विलास कुलकर्णी

Prasad Tanpure : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर-कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांना घरी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

राहुरी येथे आज (रविवारी) पत्रकारांशी बोलतांना माजी खासदार तनपुरे म्हणाले, "केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी कुणालाही न सांगता अचानक कोपरगाव-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनातून प्रवास करावा. या महामार्गाच्या दुरवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा आणि माझ्या घरी भोजनाला यावे," असे आमंत्रण तनपुरे यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, "केंद्रीय मंत्री गडकरी यांना आमंत्रण देण्यामागे कुठलाही राजकीय उद्देश नाही. कोपरगाव-अहमदनगर रस्त्याचे भाग्य उजळण्याची क्षमता फक्त मंत्री गडकरी यांच्यात आहे. ते राजकारण विरहित दूरदृष्टीचे, अभ्यासू व व्हीजन असलेले नेतृत्व आहे. त्यांनी या महामार्गावर प्रवास केल्यावर सर्वसामान्य जनतेचा त्रास, हालअपेष्टा, जीविताचा धोका त्यांना याची देही याची डोळा दिसेल. एवढाच मुख्य उद्देश आहे."

"पंधरा टक्के पेक्षा जास्त निविदा भरल्यावर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाते. कोपरगाव-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गासाठी ठेकेदाराने तब्बल 26 टक्के कमी दराने निविदा भरली. जीएसटीसह 49 टक्के कमी रक्कमेची निविदा स्वीकारणे अव्यवहार्य होते. त्याचवेळी ठेकेदार काम पूर्ण करू शकत नाही. यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेला. हे होणारच होते."

परंतु, ठेकेदाराने रस्त्याचे काम करतांना ठिकठिकाणी चौपदरी रस्त्याची एक बाजू उखडून ठेवली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक होत आहे. अगोदरच खड्ड्यांनी महामार्ग व्यापला आहे. त्यात, एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील खड्डे मोठे व खोल झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यावर अंदाज येत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने आदळून अपघातांना निमंत्रण ठरत आहे."

"रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त प्रवासी अपघातात ठार झाले आहेत. शेकडो प्रवाशांना अपंगत्व आले आहे. वाहने खिळखळी झाली आहेत. रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. सर्वसामान्य जनतेचे उत्तरदायित्व असलेले लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. अशा परिस्थितीत केवळ केंद्रीय मंत्री गडकरी हेच एकमेव आशेचे किरण आहेत. त्यामुळे, त्यांना आवाहन करीत आहे." असेही खासदार तनपुरे यांनी स्पष्ट केले.

"मला या विषयावर राजकारण करायचे नाही. कुणालाही मते मागायची नाहीत. परंतु, माझ्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेने माझ्यावर मनापासून प्रेम केले. त्यांचे उत्तरदायित्व म्हणून सामान्य जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर वाचा फोडणे माझे कर्तव्य समजतो. केंद्रीय मंत्री गडकरी याच विचाराचे असल्याने, त्यांना रस्त्याची पाहणी करून, भोजनाचे आमंत्रण देत आहे."

- प्रसाद तनपुरे, माजी खासदार, राहुरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT