Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan on NDA Goverment : '..म्हणून केंद्रातील NDA सरकार टिकणार नाही' ; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!

हेमंत पवार - Hemant Pawar

Prithviraj Chavan News : 'देशात सत्तेत आलेल्या एनडीए आघाडीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यातच चंद्राबाबू नायडू व नितीशकुमारांनी केंद्राकडे आंध्र प्रदेश व बिहारला विशेष दर्जाची मागणी केली आहे. ते दिले तर अन्य राज्येही मागणी करणार. त्यामुळे केंद्रातील NDA आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही.', असा दावा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूका या कॉंग्रेस महाविकास आघाडीबरोबरच लढेल, असे स्पष्ट करुन साताऱ्यातील पराभवाची कारण मिमांसा पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊ करणार आहोत, असे ही त्यांनी सांगितले.

कराड (जि.सातारा) येथील बाजार समितीच्या मुख्य कमानीचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयसिंह पाटील-उंडाळखर उपस्थिती होते. पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) म्हणाले, देशात अपेक्षेप्रमाणे मोदींना मतदारांनी नाकारले त्यामुळे मोदींना नितीशकुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली आणि सरकार आले. राज्यात आम्ही अंदाज बांधल्यानुसार आमच्या जागा निवडून आल्या आहेत.

तसेच, 'केंद्रात सरकार जरी एनडीए आघाडीचे आले तरी राज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. मात्र, तसे केले तर लोकसभेवरील मोदींचे नियंत्रण जाईल त्यामुळे ते उपसभापती विरोधी पक्षाला देणार नाहीत असे वाटते.' असंही चव्हाण म्हणाले.

मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील घटनेसंदर्भात ते म्हणाले, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात निवडणूक आयोगाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र त्या एफआयआरची माहिती दिली जात नाही, यामुळे याच्यामागे काही गौडबंगाल तर नाही ना? अशी शंका येत आहे. मतमोजणी ठिकाणी फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असते, मात्र तेथील विजयी उमेदवाराच्या मेहुण्याकडे मोबाईल कसा काय आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाविकास एकत्र लढणार... -

आगामी विधानसभेच्या निवडणुकाबाबत ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार आहोत. त्या संदर्भात औपचारिक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी लोकांसाठी योग्य व आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून जाहीरनामा मांडणार आहेत. या साठी आम्ही जाहीरनामा समिती लवकर स्थापन करणार आहोत.

लोकसभेतील अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वरिष्ठांकडे कार्यमुक्त करण्याची मागणी केली त्यावर ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्यतरी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मोठा चेहरा नाही. विनोद तावडे आहेत मात्र त्यांचा राज्याशी सध्या संपर्क कमी आहे त्यामुळं त्यांना राज्याची जबाबदारी झेपेल असे वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडले हे जरी खरे असले तरी मोदींच्या परवानगी शिवाय हे शक्य होणार नाही. फडणवीसांनी जे काही केले ते मोदींच्या सांगण्यावरून केले असे म्हणत यावर अधिक भाषय केले नाही.

'वंचित'ला सन्मापुर्वक जागा देणार -

वंचित बहुजन आघाडीला लोकसभेसाठी आम्ही पाच जागा देत होतो. ते जर आमच्याबरोबर आले तर विधानसभेला देखील सन्मानपूर्वक जागा आम्ही त्यांना देऊ असे स्पष्ट करुन आमदार चव्हाण म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडी आली असती तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून देखील आले असते आणि लोकसभेत डॉ. आंबेडकरांच्या कुटुंबातील वारसदार म्हणून त्यांची देशभर ओळख झाली असती, मात्र तसे झाले नाही.

धार्मिक धुव्रीकरणामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये धक्का -

लोकसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण मधील मतदानाच्या आकडेवारी ही धक्कादायक आहे. विरोधकांकडून या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पैशांचे वाटप झाले. याचबरोबर धार्मिक ध्रुवीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे दक्षिण मध्ये या धक्कादायक निकालाची कारणमीमांसा करण्यासाठी लवकरच पंचायत समिती गण निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आम्ही घेणार आहोत. यात दक्षिण मध्ये नेमके आमचे कुठे चुकले का चुकले या सर्वांची कारणे शोधणार आहोत असे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT