Pandharpur, 10 May : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे, असे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार का, अशी चर्चा रंगलेली असताना पवारांच्या निकटवर्तीय आमदाराने मनोमिलन कधी होणार, हे सांगून टाकले आहे. तसेच, त्याची प्रक्रिया कशी असणार, याचाही उलगडा केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चार आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जाण्याचा निरोप पवारांपर्यंत पोचवला होता. त्याला शरद पवार यांनी मुलाखतीत केलेल्या विधानाने तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी मोठे भाष्य केले आहे.
‘दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) मनोमिलनाची प्रक्रिया भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर होण्याची शक्यता आहे. याबाबत सुरुवातीला दोन्ही पक्षांमधील आमदारांची बैठक होईल. त्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणाची सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, असा दावा आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल, असे म्हटले होते. त्यानंतर अभिजीत पाटील यांनीही एकीकरणाच्या प्रक्रियेबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी पॉझिटिव्ह असल्याचे जाणवले.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये कुठेही कटुता अथवा दुरावा दिसून येत नाही, त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल. दोन्ही पवारांनी एकत्र यावे, अशी आमची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे, असे अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.
आमची जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून सुप्रिया सुळे यांच्याशी थोडक्यात बोलणे झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या मतदारसंघातील कामाबाबत नेहमीच सकारात्मक असतात. त्यांच्याकडून आमच्या कामात कोणतीही आडकाठी आणली जात नाही, त्यामुळे सध्या एकत्रिकरणासाठी सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. तशी भूमिका वरिष्ठांनी घ्यावी, अशी विनंती आम्ही केल्याचे पाटील यांनी सांतिले.
आमदार पाटील म्हणाले, भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर याबाबत आमदारांची बैठक होऊन त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. दोन्ही पक्ष एकत्र आले तर सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे ताकद वाढणार आहे. कार्यकर्ते त्यासाठी आग्रही आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.