पुण्यात अवैध बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याचा प्रश्न गंभीर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ATS आणि NIA चौकशीसह कॉम्बिंग ऑपरेशनची मागणी केली आहे.
बनावट कागदपत्रांच्या साखळीचा तपास आणि अटक केलेल्यांची त्वरित हद्दपारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Pune News : पुणे शहरातील अवैध बांगलादेशी नागरिकांचा वास्तव्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या बांगलादेशींबाबत आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे.
मिसाळ यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरातील अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या संख्येविषयीची तीव्र चिंता मी आपणासमोर मांडत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या हालचाली आणि स्थलांतर वेगाने वाढले आहे.
मागील अनुभवावरून हे स्पष्ट आहे की निवडणुकीनंतर उदरनिर्वाहासाठी हे घुसखोर मोठ्या संख्येने महाराष्ट्र, विशेषतः पुण्याकडे स्थलांतरित होतात. याचा थेट भार पुण्याच्या कायदा-सुव्यवस्था, रोजगार व सामाजिक संरचनेवर पडतो. २०२३ मधील राज्य गुप्तचर सर्वेक्षणानुसार पुण्यात ५,००० बांगलादेशी नागरिक सहकुटुंब वास्तव्यास होते. त्यापैकी तीन वर्षांत केवळ ५ जणांची हाकालपट्टी करण्यात आली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. ६८३ पोलीस कर्मचारी, ४१ इमारती, ७०० जणांची चौकशी झाली. दोन बांगलादेशी महिला आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुण्यातील घुसखोरांची अंदाजित संख्या सध्या ५० हजारांपर्यंत असल्याचा अंदाज वर्तवला जातो. हे घुसखोर बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदार ओळखपत्र तयार करून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
विशेष चिंतेची बाब म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातील फायद्यासाठी अश्या बांग्लादेशी नागरिकांना पाठीशी घालणाऱ्यांची संख्या वाढतच जात असून असंघटित व्यापार क्षेत्रांत, विशेषतः मांस विक्री व कुक्कुट व्यवसायात, मोठ्या प्रमाणावर घुसखोरांचा रोजगार दिला जातो. यातच पुण्यातील लक्ष्मी रोड, फर्ग्युसन रोड यासारख्या प्रमुख गर्दीच्या ठिकाणी महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हेतुपुरस्सर किंवा आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्यांची सखोल चौकशी होणे, राष्ट्रहितासाठी अत्यंतिक महत्त्वाचे आहे.
त्यासाठी पुणे शहरातील झोपडपट्ट्या, दाटवस्ती, बांधकाम साइट्स व असंघटित व्यापार क्षेत्रांत तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवावे आणि बनावट कागदपत्रे निर्मितीच्या साखळीचा छडा लावण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (ATS) व राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांचे संयुक्त पथक नेमावे.तसेच पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदींची विशेष तपासणी समिती नेमून घुसखोरांना अभय देणाऱ्या आरोपींची निष्पक्ष व त्वरित चौकशी करावी. अटक केलेल्यांची त्वरित हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करावी. अशी मागणी माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
1. हा मुद्दा का चर्चेत आला आहे?
पुण्यात अवैध बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या वास्तव्यामुळे हा मुद्दा गंभीर बनला आहे.
2. कोणत्या नेत्याने यावर चिंता व्यक्त केली आहे?
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या विषयावर पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
3. कोणती कारवाई सुचवण्यात आली आहे?
कॉम्बिंग ऑपरेशन, ATS आणि NIA चौकशी, तसेच कागदपत्रांची तपासणी सुचवण्यात आली आहे.
4. कोणत्या भागांमध्ये तपासणी होणार आहे?
झोपडपट्ट्या, दाटवस्ती, बांधकाम साइट्स आणि असंघटित व्यापार क्षेत्रांमध्ये तपासणीची मागणी आहे.
5. अटक झालेल्यांबाबत काय प्रस्ताव आहे?
अटक केलेल्या घुसखोरांची त्वरित हद्दपारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.