Vikram Kale
Vikram Kale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पंचायतराज समितीच्या पाहुणचारासाठी 3 कोटी गोळा केले..? विक्रम काळेंनी कानावर हात ठेवले!

प्रमोद बोडके

सोलापूर : आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांत जातो, त्या ठिकाणी आम्ही आमची व्यवस्था आमूक ठिकाणी करा, आम्हाला हे हवे, असे आम्ही कधीच सांगत नाही. आमच्या नावावर जर कोणी पैसे गोळा केले असतील, तर ते कठीणच आहे. आम्ही काहीच सांगितले नसताना आमच्या नावाने कोणी पावती फाडत असेल, तर ते चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण पंचायत राज समितीचे (Panchayat Raj Samiti) सदस्य आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी दिले. (Raised Rs 3 crore for the hospitality of Panchayat Raj Samiti at solapur)

तुमची समिती सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर येत आहे, म्हटल्यावर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना टार्गेट देऊन तीन कोटी रुपये गोळा केली असल्याची माहिती पत्रकारांनी काळे यांना दिली. या माहितीवर काळे यांनी स्वतःचे हात कानावर लावत ‘हे ऐकायला किती बरं वाटतंय,’ असं म्हणत आम्ही अनेक जिल्ह्यात जातो. मात्र, असे करायला कोणालाच सांगत नाही. आमच्या नावावर पावती फाडली जात असेल तर चुकीचे आहे, असे काळे निक्षून सांगितले. पंचायत राज समिती ज्या जिल्ह्यात जाते, त्या जिल्हा परिषदेला समिती सदस्यांच्या वाहन, भोजन, निवास आदीच्या व्यवस्थेसाठी निधी खर्च करण्याची मुभा राज्य सरकार देत असते, त्यामुळे वेगळा निधी गोळा करण्याची आवश्यकता नाही, असेही काळे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, समितीच्या नावावर गोळा करण्यात येणाऱ्या पैशाबाबतचे कुठेही पुरावे अथवा नोंद नसते, त्यामुळे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो, त्या ठिकाणी सरकारी निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे पाहतो. यंत्रणा सर्वसामन्यांसाठी काम करते की नाही, हे पाहणे आमच्यासाठी प्राधान्याचे असते.

विधान मंडळाच्या पंचायत राज समितीच्या सोलापूर जिल्हा परिषद दौऱ्याचा आज समारोप झाला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात चेअरमन संजय रायमुलकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात काळे यांना याबाबत छेडण्यात आले असते त्यांनी वरील भाष्य केले. या प्रसंगी समितीचे सदस्य अनिल पाटील, कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदे संदर्भात असलेल्या तक्रारींवर एक महिन्याच्या आत अहवाल सादर करा. ज्या विभाग प्रमुखांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींवर त्या विभागाच्य सचिवांची साक्ष घेतली जाईल. तीन दिवसांच्या दौऱ्यांमध्ये आम्हाला ३५ ते ४० निवेदने मिळाली असल्याची माहिती पंचायतराज समितीचे चेअरमन संजय रायमुलकर यांनी दिली.

चेअरमन रायमुलकर म्हणाले, उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीला स्वत:ची इमारत असावी यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. समिती सोलापूर जिल्ह्यात आल्यामुळे २००६-२००७ पासून थकित असलेली एक कोटी रुपयांची रक्कम वसूल झाली आहे. समितीचा अहवाल विधी मंडळात सादर केला जाणार आहे. त्यामुळे समितीच्या पाहणीतील सर्वच बाबी सांगता येणार नाहीत. जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदांसाठी काही धोरणात्मक निर्णय आवश्‍यक आहेत. त्यासाठी पंचायतराज समिती शिफारस करणार आहे. एखाद्या प्रकरणात आरोप करणे सोपे आहे परंतु केलेले आरोप सिध्द करणे कठीण असते. सोलापूर जिल्हा परिषदेने काही चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी त्याची अंमलबजावणी करावी या संदर्भात आम्ही शिफारस करणार असल्याचेही चेअरमन रायमुलकर यांनी सांगितले. आज दिवसभरात समितीच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची साक्ष नोंदविली.

सायकल बँक, कोरोनामुक्त गावचा प्रसार करू

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेली सायकल बँक, कोरोना महामारीत राबविलेले माझे गाव कोरोना मुक्त गाव हे उपक्रम महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी राज्यातील इतर जिल्हा परिषदांनीही करावी या संदर्भात आम्ही प्रसार करू अशी माहिती सतिमीचे चेअरमन रायमुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT