Rajaram Bapu Patil: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केली. यावरुन राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजली आहे. थेट शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून पडळकरांची तक्रार केली असून त्यांना समज देण्याची विनंती केली. तसंच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पडळकरांचा समाचार घेतला आहे. पण यामुळं जयंत पाटील आणि त्यांचं कुटुंब चर्चेत आलं आहे.
राजारामबापू पाटील कोण आहेत? हे तर अवघा महाराष्ट्र जाणतो. तसंच त्यांचे पुत्र असलेल्या जयंत पाटलांनाही महाराष्ट्र ओळखतो. पण राजारामबापूंची इतर मुलं कोण आहेत? ते काय करतात? याची फारशी कोणाला माहिती नाही. या विशेष वृत्तांतातून आपण हे जाणून घेणार आहोत.
राजारामबापू पाटील यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला. शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, त्यांचे वडील अनंत दादा व त्यांचे भाऊ ज्ञानू बुवा हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. कोल्हापुरात 'लॉ'चे शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. सांगलीच्या वाळवा तालुक्यात शिक्षणाच्या योग्य संधी अभावी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे, बड़ोदा, कोल्हापुरात शिक्षण घेत ते कासेगावचे पहिले वकील बनले. १९४५ साली त्यांनी 'कासेगाव एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. अत्यंत कमी अवधीत या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विणले. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी शेवटपर्यत प्रयत्र केले. साने गुरुजी हे त्यांचे अगदी जवळचे होते.
१९५२ साली सांगली जिल्हा बोर्डचे अध्यक्ष झाल्यानंतर राजारामबापू यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. लोकप्रियतेमुळे १९६२ साली ते पहिल्यांदा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पुढील २२ वर्षे त्यांनी निर्विवाद आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अवघ्या १४ महिन्यांत वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्या जोरावर सलग १२ वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली.
राजारामबापू पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता पत्नी कुसुमताई पाटील यांच्यापासून त्यांना पाच अपत्ये आहेत, तीन मुली आणि दोन मुले. यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील हे पाचवे अपत्य आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील तनपुरे या राजकीय कुटुंबात जयंत पाटील यांची सर्वात मोठी बहीण उषादेवी यांचं लग्न झालं. उषादेवी प्रसादराव तनपुरे हे त्यांचं नाव. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या त्या मातोश्री होय.
तर भगतसिंह पाटील हे राजाराम बापू यांचे दुसरे अपत्य आहेत. आजवर ते कधाही राजकारणाच्या व्यासपीठावर दिसलेले नाहीत. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचा प्रशासकीय कारभार आणि उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. राजारामबापूंचं तिसरं अपत्य विजयाताई यांचा पुण्यातील नामवंत जगताप कुटुंबात विवाह झाला. तर चौथ्या नीलिमाताई घुले पाटील यांचा अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रात नाव कमावलेल्या घुले पाटील याच्या कुटुंबात विवाह झाला. त्यानंतर पाचवे अपत्य माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील असून महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.