Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ठाकरेंनी आदेश दिल्यास कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्याच मालकीचे असल्याचे दाखवून देऊ!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : काँग्रेसचे (congress) कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल जाधव यांच्या पत्नीला उमेदवारीसाठी भाजपत येण्याची ऑफर दिली होती, तर आज शिवसेनेचे राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पण, ज्यांची ही जागा आहे, ती काँग्रेस मात्र सध्यातरी शांतच आहे. (Rajesh Kshirsagar expressed readiness to contest from Kolhapur North constituency)

कोल्हापूर येथील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शिवेसना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास आपण पोटनिवडणूक लढवून हा मतदासंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्यासाठी सज्ज आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद एकत्रित लढायची नाही, अशी कॉंग्रेसची भाषा आहे. अशीच परिस्थिती असेल तर पक्षप्रमुखांना आपल्या भावना पटवून देऊ की कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेच्या मालकीचीच आहे. निवडणूक लढण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करू. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपबरोबर युती केली. हे आमच्या पक्षप्रमुखांनाही माहित आहे. शिवसेनाला कोणी नाकारतोय डावलतोय म्हणून ती कधी मागे राहीलेली नाही. जिल्हा बँकेत पाच जागा जिंकून शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला आपली ताकद दाखवून दिली आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आव्हानही त्यांनी दोन्ही काँग्रेसला दिले.

चंद्रकांत पाटील यांनी जाधव कुटुंबातील दोन नगरसेवक आपलेच आहेत. पण, युती झाल्याने तिकीट देता येत नाही; म्हणून चंद्रकांत जाधव यांना कॉंग्रेसमध्ये पाठवले, असे सांगितले. त्यांनी जाहीरपणे कबुली देऊन गद्दारी केल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जरा मागे वळून पहावे. त्यांना शिवसेनेमुळेच पदवीधरमधून विजय मिळाला होता हे विसरू नये. मी प्रत्येक आंदोलन, विकास कामात सक्रीय होतो. तरीही २०१९ च्या निवडणूक काळात माझी विरोधकांनी सातत्याने बदनामी केली. माझा पराभवा पेक्षा शहराचा विकास झाला नाही याचे मला वाईट वाटते. राज्यात कोणत्याही समित्या अस्तित्वात नसताना पक्षप्रमुखांनी मला राज्य नियोजन मंडळाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून महापूर, कोविड काळात मी चांगले काम करून भरघोस विकास निधी आणू शकलो, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले

माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, ‘शिवसेनेच्या चार नगरसेवकांना बरोबर घेतल्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नव्हती. जनतेला क्षीरसागर यांच्यासारखा नेता हवा आहे.’ किशोर घाटगे यांनी पक्षांतर्गत गद्दारांच्या निषेधाचा ठराव मांडला. महाविकास आघाडीत आघाडीचा धर्म पाळला जात नसेल तर ही आघाडीच नको, असा सूर बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमधून व्यक्त करण्यात आला.

दीपक गौड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी माजी नगरसवेक नंदकुमार मोरे, रवी चौगले, ऋतुराज क्षीरसागर, पूजा भोरे, मंगल साळोखे, रूपेश इंगवले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. अंकूश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. शहर प्रमुख जयवंत हारूगले यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT