Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांनी वाढविले सतेज पाटलांचे टेन्शन!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Khsirsagar) हे आग्रही असल्याने येथे महाविकास आघाडीत पेच होण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काय निर्णय घेणार यावर आता पुढील समीकरणे अवलंबून असणार आहेत.

त्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिदिनी शिवसैनिकांना संबोधित करताना सर्व निवडणुका लढविण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे शिवसैनिकांनाही या जागेसाठी उत्साह आला आहे. मात्र काॅंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचा उमेदवार येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेमुळे उत्तरमधून लढण्याच्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून ते २०१९ पर्यंत कोल्हापूर उत्तर हा शिवसेनचा बालेकिल्ला राहीला आहे. शिवसनेने १९९० मध्ये हा मतदारसंघ ताब्यात घेतला, त्यावेळी कै. दिलीप देसाई शिवसेनेचे या मतदार संघाचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर ९५ व ९९ च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शाबूत ठेवला. २००४ मध्ये माजी आमदार मालोजीराजे यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला, पण त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत श्री. क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ लाही श्री. क्षीरसागर हेच आमदार राहीले. २०१९ मध्ये मात्र काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

कै. जाधव यांचे निधन झाल्याने उत्तरच्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसकडून कै. जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री यांची उमेदवारी निश्‍चित आहे. दुसरीकडे श्री. क्षीरसागर यांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसचे मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. ‘उत्तर’ ची जागा काँग्रेसची असल्याने शिवसेनेने ही निवडणूक लढवू नये यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यावर राज्य पातळीवरील सेना नेत्यांनी आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. श्री. क्षीरसागर यांनी मात्र नेत्यांच्या पातळीवर लढण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसांत शिष्टमंडळासह ते मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल, तथापि मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मिळावी असा दबाव शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वाकडून सुरू आहे.


.तर तिरंगी लढत
भाजपकडून ही निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन्हीही पोटनिवडणुकांत भाजपने उमेदवार उभे केले आहेत, यापैकी पंढरपुरची जागा भाजपने तर देगलूरची जागा काॅंग्रेसने जिंकली. त्या धर्तीवर ही जागाही लढवण्याचे भाजपच्या पातळीवर निश्‍चित आहे. भाजप रिंगणात उतरले आणि शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत म्हणून शड्डू ठोकला तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT