Devendra Fadnavis-Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News: राजू शेट्टींचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गंभीर आरोप; म्हणाले,'मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर..'

Solapur Farmers Protest : पंढरपूर तालुक्यातील वाखरीत सुरू असलेलं ऊसदरासाठीचं बेमुदत उपोषण माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले.

Deepak Kulkarni

Solapur Farmers Protest: सोलापूर जिल्ह्यात ऐन कडाक्याच्या थंडीत ऊस दराचं आंदोलन पेटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक आंदोलक शेतकरी समाधान फाटे हे बेमुदत उपोषणाला बसले होते. फाटे यांची तब्येत शनिवारी सहाव्या दिवशी अत्यंत खालावल्यामुळे राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी आपला मोर्चा पंढरपूरकडे वळवला होता. याचदरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याची टीका केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील वाखरीत सुरू असलेलं ऊसदरासाठीचं बेमुदत उपोषण माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले. गेल्या सहा दिवसांपासून ऊसाला साडेतीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळावा,या मागणीसाठी समाधान फाटे आणि त्यांचे तीन सहकारी वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसले होते.

वाखरी येथील ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांचं बेमुदत उपोषण सुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. काटामारी बाहेर काढू असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचा हल्लाबोलही यावेळी केला.तसेच गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू असूनही सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

शेट्टी म्हणाले,स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील जवळपास 51 साखर कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त पहिली उचल मिळू शकली.एका बाजूला सरकार न्यायालयात एफआरपीचे तुकडे पाडण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वाभिमानीमुळे मात्र 51 साखर कारखान्यांना पहिली उचल 3000 पेक्षा जास्त देण्यास भाग पडलं. हा खरा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असल्याची प्रतिक्रियाही शेट्टी यांनी दिली.

तसेच राजू शेट्टी यांनी यावेळी सोलापूर जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांनी अजून 3 हजार भाव दिला नाही त्या ठिकाणी गव्हाणीत उड्या मारून कारखाने बंद करण्याचं आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.स्वाभिमानीने शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून एफआरपी पेक्षा जास्त रक्कम मिळवून दिल्याचं सांगतानाच हा सरकार व कारखानदारांचा पराभव असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.

दरम्यान, राज्य सरकारनं तातडीने यात हस्तक्षेप न केल्यास जिल्ह्यातील या आंदोलनाचा भडका राज्यभर पोहोचेल,असा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.ऊस दर वाढवून न देण्यासाठी तुम्ही कारखानदार एक येत असाल तर आता आम्ही शेतकऱ्यांचा दर मिळवण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT