Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghtana: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'स्वाभिमानी' करणार मोठा धमाका; शेट्टींच्या हालचाली वाढल्या

Rahul Gadkar

Swabhimani Shetkari Sanghatna News : महाविकास आघाडी आणि महायुतीशी खटके उडाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी अखेर तिसऱ्या आघाडीचा जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राजू शेट्टींनी घटक पक्षांची जुळवाजुळव करत परिवर्तन महाशक्ती आघाडी उघडली आहे. या आघाडीद्वारे शेट्टी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शेतकरी प्रश्नांवरुन राजकारण तापवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चालू वर्षाच्या गळीत हंगामातील 23 वी ऊस परिषद 25 ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावरती होणार आहे. त्याबरोबरच गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रूपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा अशी मागणी उचलून धरली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatna) ऊस परिषद 25 ऑक्टोबरला बोलावली आहे. या परिषदेतून ते विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. तसेच यावेळी ते महायुतीला घेणार की महाविकास आघाडीवर हल्लाबोल करणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेण्यात हे या मेळाव्यातूनच ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात महायुती आणि महाविकास आघाडीवर आसूड ओढले होते.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेची घोषणा आज राजू शेट्टी यांनी केली. या मेळाव्यात बोलताना, शेट्टी यांनी, देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे. साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले आहेत. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफ. आर. पी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.

राज्य सरकार कारखादारांच्या पाठीशी असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना संघर्षाशिवाय काहीच पडणार नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मुग गिळून गप्प अशी भूमिका राजू शेट्टी यांनी या मेळाव्यातून मांडली.

प्रा. जालंदर पाटील बोलताना म्हणाले की, चळवळीतील ताकत व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देवू शकते. यामुळे शेतकरी , शेतमजूर , कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील. शेतकरी संघटीत करण्याच काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय उभा राहिला आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT