Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti On Alliance : दोघांचा नाद केला अन् आता राजू शेट्टी म्हणतात, 'त्यांच्यासोबत का जाऊ?'

Rahul Gadkar

Raju Shetti On Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोघांचाही नाद करून पाहिल्यानंतर शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. कोणासोबत स्वाभिमानी ही राजकीय संधान बांधणार नसून, कोणी पाठिंबा दिला तर त्याला नाही म्हणणार नाही, स्वाभिमानीची भूमिका ही 'एकाला चलो ची' असेल असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

महायुतीसोबत तर जाण्याचा प्रश्‍नच येत नाही पण महाविकास आघाडीसोबतही जाणार नाही. यापूर्वी ज्यांच्यासोबत गेलो त्यांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. एकंदरीत दोघांचीही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याचे दिसले. आता स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच स्वतंत्रपणे या निवडणुकीत आपण उतरावे, तुम्हाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आम्ही मिळवून देऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच संघटना आणि संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर स्वतंत्रपणे ही निवडणूक मी लढवणार आहे, असे स्पष्ट मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपली कोणाशीही आघाडी नसेल. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्यास सांगितल्याने ‘एकला चलो’ हीच आपली भूमिका असेल, असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. महायुतीसोबत तर नाहीच नाही पण महाविकास आघाडीसोबतही जाण्याचा प्रश्‍न येत नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर जो अनुभव आला तो वाईट आल्यानंतर त्यांच्यातून बाहेर पडलो. आलेल्या अनुभवाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सहा पानी पत्र लिहले, पण त्याचे उत्तरही अजून मला मिळालेले नाही. त्यांना त्या पत्राचे उत्तर देऊ वाटले नाही. मग त्यांच्यासोबत जायचे कशाला?’ असा सवाल शेट्टी यांनी केला.

मी कोणाचा पाठिंबा मागणार नाही

लोकसभेबाबत मी स्वतःहून कोणाशी चर्चा करणार नाही. पण कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी आपला उमेदवार माझ्याविरोधात उभा न करता तो द्यावा. त्यानंतर त्यांनी माझ्या प्रचाराला यावे अशीही माझी अट नाही. २०१४ असेल किंवा २०१९ मध्ये मी त्या प्राप्त परिस्थितीत पाठिंबा घेतला असेल. पण यापुढे तसा पाठिंबा घेणार नाही. ऊसदरावरून मी पुकारलेल्या आंदोलनाला विरोधकांनी तोंडदेखला तरी पाठिंबा द्यायला हवा होता, पण ते तसे करत नाहीत, मग त्यांच्या मागे कशाला लागयाचे. माझे कार्यकर्ते, माझी संघटना माझ्या मागे आहेत. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही.’असेही शेट्टी म्हणाले.

आता तर यांची कर्ज फिटणार का? आम्हाला मिश्या फुटल्यापासून साखर कारखानदारांची कर्ज आहेत, असे ऐकत आलो आहे. एखादा मुद्दा उपस्थित केला की कारखानदार हाच मुद्द्दा पुढे करत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून आमच्यावर कर्जं आहेत, हेच ऐकत आलो आहे. याना शेतकऱ्यांना पैसे द्यायचा नाही. यांना येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा पैसा उधळायचा आहे. आरोप शेट्टी यांनी कारखानदारांवर केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT