Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Protest : 'मागील' शब्दावरून पुढचं घोडं अडलं, ऊसदर आंदोलनाची कोंडी फुटली?

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची कोंडी फुटली असल्याचे वृत्त समोर येत आहे. मागील हंगामातील तुटलेल्या उसाला ४०० ऐवजी १०० रुपये देण्यास कोल्हापुरातील काही कारखानदार तयार झाले असल्याची माहिती आहे. मात्र, कारखानदारांनी 'मागील' हा शब्द काढण्याची विनंती शेट्टी यांना केली असल्याचे समजते. जिल्हा प्रशासन आणि संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चर्चा सुरू असून, 100 रुपये देण्याची घोषणा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा उसाला प्रतिटन 3500 रुपये दर आणि मागील हंगामातील तुटलेल्या उसाचे उर्वरित चारशे रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे यासाठी गेल्या महिनाभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज याच मागणीसाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तीन तास रोखला आहे. यापूर्वी कारखानदार जिल्हा प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यातील तीन वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या. त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे.

मात्र सहकारमंत्र्यांच्या बैठकीत स्वाभिमानी तीन पावले मागे आल्याचं बोललं जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 400 ऐवजी 100 रुपये तरी मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली होती. मात्र, त्यालाही काही कारखानदारांची नकारघंटा होती. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज महामार्ग रोखल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ राजू शेट्टी यांच्या संपर्कात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या कारखानदारांना पैसे द्यायचे आहेत, त्यांना रोखू नका, ज्यांना द्यायचे नाहीत त्यांना आम्ही बघून घेऊ, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावले असल्याची माहिती आहे. अखेर काही कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मान्य करण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. मागील हंगामातील शंभर रुपये देण्यावर काही कारखानदारांनी संमती दाखवल्याची माहिती आहे. मात्र, त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

काही कारखानदारांनी 'मागील' हा शब्द काढावा, तसेच मागील वर्षाची एफआरपी 100 रुपये अधिक देण्यात येतील. पण मागील शंभर रुपये देण्यासाठी राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवण्यात येईल. गळीत हंगामानंतर ते पैसे शेतकऱ्यांना देऊ असा प्रस्ताव कारखानदारांनी शेट्टी यांना दिल्याचे समजते. मात्र, कारखानदारांनी घोषणा केल्यानंतरच हे आंदोलन मागे घेतले जाईल, अशी ठाम भूमिका शेट्टी यांनी घेतल्याचे समजते. त्याबाबत घोषणा झाल्यास आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे. शेट्टी आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT